इर्विन चौकात देशभक्तीचा हुंकार
By Admin | Updated: March 24, 2016 00:41 IST2016-03-24T00:41:29+5:302016-03-24T00:41:29+5:30
प्रहार संघटनेच्यावतीने क्रांतिवीर शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त गुरुवारी आदरांजली कार्यक्रम पार पडला.

इर्विन चौकात देशभक्तीचा हुंकार
आदरांजली : प्रहारतर्फे शहिदांना नमन
अमरावती : प्रहार संघटनेच्यावतीने क्रांतिवीर शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त गुरुवारी आदरांजली कार्यक्रम पार पडला. यावेळी शहिदांचे बलिदान, देशभक्तिपर नाऱ्यांनी इर्वीन चौक दुमदुमला.
स्थानिक इर्विन चौकातील शहीद स्मारकाजवळ दरवर्षी प्रहार संघटनेच्यावतीने शहीद दिन साजरा केला जातो. यावर्षी देखील प्रहारने शहीद दिन साजरा करुन शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना आदरांजली वाहिली. यावेळी कार्यकर्त्यांनी देशभक्तीपर नारे देवून जल्लोष केला. शहीद स्मारक परिसर रोषणाईने झाकोळला होता. येथे फडकणारे तिरंगे ध्वज लक्ष वेधणारे ठरले. शहीद स्मारकांचे पूजन, आदरांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर प्रहार संघटनेचे संस्थापक आ. बच्चू कडू, जिल्हाध्यक्ष छोटू महाराज, शहराध्यक्ष धीरज जयस्वाल, प्रशांत कांबळे, संदीप कंठाळे, आशिष पाटील, मोनू शर्मा उपस्थित होते. भिवापूरकर अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गिते सादर केले. यावेळी उपस्थितांनी शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव अमर रहे, वंदे मातरम्, भारत माता की जय’ चे नारे देवून देशभक्तिचा हुंकार चढविला. दिग्दर्शक सौपान रत्नपारखी, निवेदक सुधीर इंगळे, वाद्यवृंद रामेश्वर बांबल, मुकेश गोरले, नंदू अटोर व विद्यार्थ्यांच्या चमुने दर्जेदार सादरीकरण केले. आ. बच्चू कडू यांनी तरुणांना देशााठी शहीद झालेल्या क्रांतीविरांची आठवण करुन दिली.