आता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 05:00 AM2020-09-07T05:00:00+5:302020-09-07T05:00:55+5:30
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत जिल्ह्यात ‘चला अमरावतीकर, मात करूया कोरोनावर’ ही मोहिम सातत्याने राबविण्यात येत आहे. मोहिमेद्वारे विविध टप्प्यांत २० लाखांहून अधिक नागरिकांशी संपर्क साधण्यात आलेला आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री यशेमती ठाकूर यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी गावोगावी, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या सहभागाने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहिम राज्य शासनाकडून राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात नियोजन सुरु आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत जिल्ह्यात ‘चला अमरावतीकर, मात करूया कोरोनावर’ ही मोहिम सातत्याने राबविण्यात येत आहे. मोहिमेद्वारे विविध टप्प्यांत २० लाखांहून अधिक नागरिकांशी संपर्क साधण्यात आलेला आहे.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री यशेमती ठाकूर यांनी दिले आहेत.
विद्यार्थी, पालक, नागरिक अशा विविध गटांसाठी निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्वयंसेवी संस्थांसह विविध क्षेत्रांतील संस्थांचा सहभागही मोहिमेत मिळविणे, विविध माध्यमांतून मोहिमेबाबत प्रभावी प्रसार करणे व जनजागृती कार्यक्रमात सातत्य ठेवण्याचे निर्देश आहेत.
स्वयंसेवकांद्वारे घरोघरी तपासणी
मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था आदी विविध विभाग, संस्थांनी समन्वय व नियोजन करावे. मोहिमेत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी, लोकांना आरोग्य शिक्षण आणि महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे तसेच संशयित कोरोना रुग्ण शोधणे, आदी बाबी पार पाडणार आहेत.
दोन टप्प्यांत राबविणार मोहीम
ही मोहीम पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान, तर दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकेपर्यंत लोकप्रतिनिधी, विविध मान्यवर, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात येणार आहे. मोहिमेत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग मिळविण्याचे निर्देश आहेत.