आंदोलनाचे सुकाणू महिलांकडे : आयोजकांचा अंदाज- पाच लक्ष मराठे एकवटणार !अमरावती : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे १३ जुलैला घडलेल्या नृशंस घटनेचा निषेध करण्यासाठी आणि मराठा आरक्षणाची मागणी बुलंद करण्यासाठी २२ सप्टेंबर रोजी मराठा समाजबांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. त्या अनुषंगाने मोर्चाचे नियोजन करण्यासाठी रविवारी येथील एका मंगल कार्यालयामध्ये दुसरी नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठ्यांचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. बैठकीदरम्यान मराठाक्रांती मोर्चाचे सुकाणू महिलांकडे सोपविण्यात आलेत. कोपर्डी येथिल दुर्दैवी भगिनीस श्रद्धांजली वाहून सकाळी ११.३० वाजता बैठकीला सुरूवात झाली. या सभेला जिल्ह्यातील दोन हजारांपेक्षा अधिक मराठे उपस्थित होते. आर्थिक रसदही पुरविणारअमरावती : यात राजकीय क्षेत्रासह सामाजिक आणि प्रत्येक घटकातील मराठ्यांचा समावेश होता. बैठकीत आर्थिक नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. नियोजन समितीच्या हाकेला साद देत अवघ्या तासाभरात मराठ्यांनी हा प्रश्न सोडविला. बहुसंख्य मराठा बांधवांनी रोख मदतची घोषणा केली. आरोग्य सुविधा, पाणी, रूग्णवाहिका, झेंडे पुरविण्याची ग्वाही स्वंयस्फूर्तीने मराठ्यांनी दिली. हा मोर्चा कोणत्याच जाती-धर्माविरुद्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. बैठकीला झालेली गर्दी मोर्चाच्या यशस्वीतेचे सुतोवाच करणारी होती. जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांनी शिस्तबद्धपणे मराठा क्रांती मोर्चाची हाक दिली असून या माध्यमातून समाजाचे अन्य प्रश्न आणि अडचणी प्रशासनासमोर मांडल्या जाणार आहेत. मोर्चात तरूण, महिला, उद्योजक, शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक, कामगार सहभागी होणार आहेत. मोर्चा यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरावर बैठकी सुरू आहेत. कुठल्याही समाजाचा विरोध नाहीमराठा समाजाच्या मोर्चाबाबत सोशल मीडियाद्वारे गैरसमज पसरविले जात आहेत. मात्र, हे मोर्चे कोणत्याही समाजाच्या विरोधात नाहीत.मराठा समाजाने आजपर्यंत बहुजन समाजाच्या न्याय्य मागण्यांना सक्रिय पाठिंबा दिला आहे. कोपर्डी प्रकरणाच्या निषेधाबरोबर मराठा समाजावर वर्षोनुवर्षे झालेल्या अन्यायाविरूद्धचा आक्रोश मूक मार्गाने प्रकट करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.स्वयंस्फूर्त प्रतिक्रियेचा परिपाकमराठा क्रांतीमोर्चा कोपर्डीत झालेल्या क्रूर घटनेची वेदना आणि सामाजिक आर्थिक उद्धवस्तीकरणाच्या पार्श्वभूमीतून आलेली स्वयंस्फूर्त प्रतिक्रिया असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. रविवारच्या दुसऱ्या नियोजन बैठकीला जिल्ह्यातून सुमारे दोन हजार मराठे एकवटले. यात महिलांचा सहभाग लक्षणिय होता. हा मोर्चा मराठ्यांच्या स्वाभिमानाचा मोर्चा असल्याने समाजातील प्रत्येकाने समाजाचे पांग फेडण्यासाठी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.मंगळवारी तिवसा येथे बैठकमराठी क्रांती मूकमोर्चासंदर्भात मंगळवार १३ सप्टेंबरला तिवसा येथे नियोजनासंदर्भात बैठक होत आहे. व्यंकटेश मंगल कार्यालयामध्ये दुपारी १ वाजता होणाऱ्या या बैठकीला सकल मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘मराठा क्रांती मोर्चा’ बैठकीला चिक्कार गर्दी
By admin | Updated: September 12, 2016 00:07 IST