अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या विजयी उमेदवारांची अधिसूचना आयोगाचे सुधारित कार्यक्रमानुसार २९ जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे आता विजयी उमेदवारांना सरपंचपदाचे वेध लागले आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाचे पत्र गुरुवारी प्राप्त झाले. त्यानुसार आता सरपंचपदाचे आरक्षण तालुकास्तरावर २ फेब्रुवारीला, तर ४ ला जिल्हास्तरावर महिला राखीव पदांची आरक्षण सोडत राहण्याची शक्यता निवडणूक विभागाने वर्तविली.
जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या १८२३ प्रभागांत ४,९०३ सदस्यपदांकरिता ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामुळे गावागावांत आता सरपंचपदाची चर्चा सुरू झालेली आहे. यापूर्वी मार्च महिन्यात ७२५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाकरिता आरक्षण सोडत कढण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रियाच आयोगाद्वारा रद्द करण्यात आली व मतदानांतर ३० दिवसांच्या आत सरपंचपदाची आरक्षण सोेडतीची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. याविषयीचे पत्रदेखील आयोगाद्वारा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाद्वारा आरक्षण सोडतीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. माहितीनुसार तालुकास्तरावर २ फेब्रुवारीला व जिल्हास्तरावर ४ ला सरपंचपदाचे सोडतीचा कार्यक्रम राहण्याची शक्यता आहे.