सामाजिक वनीकरणाला चिंता : रोपटे जगविण्यासाठी उपाययोजना अमरावती : राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून दोन कोटी वृक्ष लागवडीचा पल्ला गाठला असला तरी पावसाने अचानक महिनाभराची दडी मारल्याने हे रोपटे जगवावे कसे, ही चिंता सामाजिक वनीकरणाला लागली आहे. परिणामी वृक्ष लागवड धोक्यात येण्याचे संकेत असून रोपटे शेवटची घटका मोजत आहे. अमरावती जिल्ह्यात दोन कोटी वृक्ष लागवडीत ४ लाख ८७ हजार वृक्षारोपण करण्यात आले आहे. आज, उद्या कधीतरी पाऊस येईल, या प्रतीक्षेत शेतकऱ्यांसह वनाधिकारी देखील आहेत. मात्र पावसाने महिन्याभरापासून दडी मारल्यामुळे वृक्ष लागवडीतील रोपट्यांना जगविणे हे फार अवघड झाले आहे. काही रोपटे सुकू लागल्याने वृक्ष लागवडीवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये वाया तर जाणार नाही, ही चिंता सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना लागली आहे. राज्य शासनाने सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी यावर्षी जलसंधारण, जलयुक्त शिवार योजना राबविली. यंदा मोसमात प्रारंभी आलेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला. नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले. यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असे गृहीत झाले. परंतु महिन्याभरापासून पाऊस अचानक दडी मारुन बसल्याने सततच्या दुष्काळामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. अशातच राज्य शासनाने जंगलाचे क्षेत्र वाढविणे, पर्यावरण संंरक्षण, जंगलाचा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी १ जुलै रोजी दोन कोटी वृक्षलागवड हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविला. दोन कोटी पेक्षा जास्त वृक्ष लागवडीचा पल्ला गाठला. सदर वृक्ष लागवड होताच राज्यभरात पावसाचे दमदार आगमन झाले. त्यामुळे वृक्ष लागवडीतील रोपटे जगतीलच नाही तर ते हिरवेगार होऊन डौलाने उभे राहतील, असे भाकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आदींनी वर्तविले होते. पंरतु गत महिन्याभरापासून पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला असला तरी सामाजिक वनीकरण विभागदेखील कोमात जाण्याच्या स्थितीत आहे. जून, जुलै या महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे रोपट्यांची चांगल्या पद्धतीने वाढ झाली. मात्र महिन्याभरापासून पावसाने उघडीप दिल्याने पाण्याअभावी रोपे सुकू लागली आहेत. डोंगरी भागात झालेल्या वृक्ष लागवडीतील रोपटे पाण्याअभावी सुकू लागली आहेत. डोंगरी भागातील रोपांना कसे जीवंत ठेवावे, हा गंभीर प्रश्न वनविभागासमोर उभा ठाकला आहे. रस्ता दुर्तफा वृक्ष लागवडीतील रोपे जगविण्यासाठी आॅक्टोंबरपासून निधीची तरतूद केली जाते. मात्र वृक्ष लागवड या महत्वकांक्षी प्रकल्पातील रोपटे जगविण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली नसल्याने ते पाण्याअभावी सुकू लागली आहेत.रोपवाटिकेतील रोपटे सुरक्षित आहेत. दोन कोटी वृक्ष लागवडीत जिल्ह्यात ४ लाख ८७ हजारांपैकी वनविभागाने १ लाख ५२ हजार एवढे वृक्षारोपण केले आहे. पावसाअभावी रोपटे जगविणे कठीण होत चालले असले तरी उपाययोजना केल्या जात आहेत.- प्रदीप मसराम,उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, अमरावती.
दोन कोटी वृक्ष लागवडीचे रोपटे मोजताहेत अखेरची घटका !
By admin | Updated: September 10, 2016 00:18 IST