धामणगाव रेल्वे : तालुक्यातील विविध समस्यांकडे शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने २७ मे रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा तहसील प्रशासनाला देण्यात आला आहे. धामणगाव तालुक्यात बंद पडलेल्या सिंगल फेज वीज यंत्रणा तातडीने सुरू करावी, वृद्धांचे तीन महिन्यापासून थकीत असलेले पेन्शन त्वरित देण्यात यावे, संजय गांधी निराधार समितीची बैठक बोलावून प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी, सन १९९४ च्या महापुराचा फटका बसलेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, विदर्भ नदीचे खोलीकरण करण्याचे काम सुरू करावे, राशन कार्डावर ३५ किलो धान्य आणि एपीएल धारकांना दर महिन्याला धान्य देण्यात यावे, रोजगार हमी योजनेंतर्गंत विहिरींच्या संख्येमध्ये वाढ करावी, अंजनसिंगी येथे नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे याशिवाय पोलीस चौकीही सुरू करावी, अंजनसिंगी येथील वाढीव विजेच्या ६७ पोलला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांसाठी यापूर्वी ३ मार्च रोजी आंदोलन करण्यात आले होते. मात्र याची दखल घेण्यात न आल्याने पुन्हा याच मुद्यावर किसान सभेच्यावतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा भाई अशोक काळे यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. प्रशासन या मागण्याबाबत काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
किसान सभा उतरणार रस्त्यावर
By admin | Updated: May 20, 2014 23:19 IST