८० हजार हेक्टरला संरक्षण : शेतकऱ्यांनी भरले साडेतीन कोटीची रक्कमअमरावती : नैसर्गिक आपत्तीपासून शेती पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी खरीप हंगामासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात आली. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांव्यतिरिक्त जिल्हा सहकारी बँकेत ८२ हजार ९१५ शेतकऱ्यांनी ७९ हजार ७११ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी ३ कोटी ५६ लाख ६३ हजार ७०४ रूपये रकमेचा भरणा केला आहे. शासनाने ३ कोटी ३९ लाख ३ हजार ६०० रुपयांचे अनुदान दिले आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैयक्तिक स्तरावर निश्चित करण्यासाठी राज्यातील सर्व अधिसूचित पिकासाठी खरीप २०१५ हंगामात अधिसूचित पिकासाठी पीक विमा लागू करण्यात आला आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे भारतीय कृषी विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत सहभाग घेतला आहे, त्या संबंधित वित्तीय कंपनीस किंवा भारतीय कृषी विमा कंपनीस कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून ४८ तासांत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीने जिल्हा महसूल तसेच कृषी विभागाच्या मदतीने नुकसान भरपाईचे प्रमाण निश्चित करण्यास येणार आहे या योजनेची अंतिम तारीख ३० जून २०१५ ही होती त्यानंतर शासनाने योजनेला ८ दिवसांची मुदतवाढ दिलेली होती. या योजनेत जिल्ह्यातील ४५ हजार ७६३ शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेत ५० हजार ७५० हेक्टर सोयाबीन क्षेत्रासाठी विमा काढला आहे. विम्याची संरक्षित रक्कम ९२ कोटी ७ लाख ३१ हजार ४०५ रूपये एवढी आहे. १५ हजार ४६८ शेतकऱ्यांनी तूर, ७ हजार ३५६ शेतकऱ्यांनी कापूस, १ हजार १४८ शेतकऱ्यांनी ज्वारी, ११ हजार ९८३ शेतकऱ्यांनी मूग, ११४ शेतकऱ्यांनी भात, २५ शेतकऱ्यांनी तीळ व १ हजार ५६ शेतकऱ्यांनी उडीद पिकासाठी विमा काढलेला आहे. (प्रतिनिधी)
८३ हजार शेतकऱ्यांचा खरीप पीक विमा
By admin | Updated: September 23, 2015 00:29 IST