‘एक जिल्हा, एक उत्पादन’ उपक्रमाचे नियोजन सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:12 IST2021-03-24T04:12:53+5:302021-03-24T04:12:53+5:30
अमरावती : प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ उपक्रमात केंद्र शासनाकडून जिल्ह्यास संत्रा फळपिकाबाबत ...

‘एक जिल्हा, एक उत्पादन’ उपक्रमाचे नियोजन सादर करा
अमरावती : प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ उपक्रमात केंद्र शासनाकडून जिल्ह्यास संत्रा फळपिकाबाबत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार कृषी व फलोत्पादन प्रक्रिया उद्योगांना चालना मिळण्यासाठी नियोजन सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी दिले.
विविध कृषी योजनांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेताना ना. ठाकूर बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी कृषी प्रशासनाकडून जिल्ह्याची स्थिती लक्षात घेऊन परिपूर्ण नियोजन करणे अपेक्षित आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत फळप्रक्रिया उद्योगांना चालना मिळण्यासाठी भरीव प्रयत्न करावेत. पुढील हंगाम लक्षात घेता, बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी अभियान राबवावे. सोयाबीन बियाण्याचे जतन व ते परिसरातील गरजूंना उपलब्ध करून देणे, त्याची उगवणक्षमता तपासणे, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची सूचना त्यांनी केली.
बॉक्स
‘पोखरा‘चे कामाचे विस्तार करा
‘पोखरा’मध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या व गटांच्या कामांना अधिक चालना मिळावा, यासाठी ‘विकेल ते पिकेल’ उपक्रमांतर्गत १२२ गटांमार्फत थेट शेतमाल विक्रीसाठी विक्रीस्थळे स्थापण्यात आली. मात्र, या कामाचा विस्तार होणे आवश्यक आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातही (स्मार्ट) प्राप्त अर्जांवर तातडीने प्रक्रिया करून संबंधितांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.