अमरावती : मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयास २०२४-२५ करिता ४५० कोटींचे टार्गेट देण्यात आले होते. सद्यस्थितीत ३३६ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झालेला आहे. या अवधीत ६५,१४० दस्तनोंदणी झालेली आहे. एक एप्रिलपासून रेडिरेकनरच्या दरात १० टक्के वाढ होणार असल्याने सध्या या कार्यालयात दस्तनोंदणीची गर्दी होत असल्याने कार्यालयाचा अवधी दोन तासांनी वाढविला आहे. त्यामुळे यंदा उच्चांकी महसूल मिळण्याची शक्यता आहे.
६५ हजार दस्तांची दहा महिन्यांत नोंदणीजिल्ह्यात आतापर्यंत म्हणजेच १ एप्रिल २०२४ ते ५ मार्च २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील १६ कार्यालयात १६,१४० दस्तनोंदणी झाली. याद्वारे ३३६ कोटींचा महसूल या विभागास प्राप्त झाला आहे. शहरातील दोन कार्यालये सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरू राहतात, तर सर्वच कार्यालये मार्चअखेरपर्यंत रात्री ८.१५ पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत.
१ एप्रिलपासून रेडिरेकनरचे दर वाढणारशासनाने कोरोना काळापासून रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही व यंदा १० टक्के वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत दस्तनोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व १६ ही कार्यालयात गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे नागरिकांना गर्दीत तिष्ठत राहावे लागू नये, यासाठी ३१ मार्चपर्यंत कार्यालयांचा अवधी दोन तासांनी वाढविण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
उद्दिष्ट कितीचे?मुद्रांक शुल्क विभागाला सन २०२४-२५ या कालावधीत ४५० कोटींच्या महसुलाचे टार्गेट आहे. त्या तुलनेत आतापर्यंत ३३६ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ही ७४.६६ टक्केवारी आहे. मार्च महिन्यात दस्तनोंदणीसाठी गर्दी होत असल्याने टार्गेट पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे या विभागाने सांगितले. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिकारी-कर्मचारी एकदिलाने परिश्रम घेत आहेत.
"जिल्ह्यास असलेल्या टार्गेटच्या तुलनेत प्राप्त महसुलाची स्थिती दिलासाजनक आहे. मार्च महिन्यात सर्व अधिकारी व कर्मचारी दोन तास जास्त सेवा देत आहेत. त्यामुळे उद्दिष्टपूर्वी निश्चित होईल."- अनिल औतकर, मुद्रांक जिल्हाधिकारी