लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रविवारी सायंकाळच्या सुमारास चिखलदरा, चांदूर बाजार तालुक्यातील कारंजा बहिरम येथे सोसाटयाच्या वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. तर, अचलपूर, दर्यापूर, तिवसा, चांदूरबाजार व वरूड, मोर्शी तालुक्यात अर्धातास जोरदार पाऊस पडला.कारंजा बहिरम येथे जवळपास अर्धातास तुफान गारपीट झाली. गारांचा जवळपास सहा ते सात इंचाचा थर रस्त्यावर आणि घरातील अंगणात साचला होता. गारपीटमुळे अनेक झाडांवरील पानाचा खाली जमिनीवर सडाच पडला. अर्धातास गारांसह जवळपास तासभर पाऊस कोसळला. परिसरातील मोबाइलचे टॉवरही काही काळ बंद पडले होते. सुरूवातीला आवळ््याएवढी आणि नंतर बोराएवढी पडलेली गार अनेक घरावरील कवेलूंमधून सरळ घरातही पडली. अचलपूर तालुक्यात सायंकाळी सव्वापाच वाजतापासून वीजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह रविवारी जोरात पाऊस पडला. वादळात झाडही उन्मळून पडली. परतवाडा, अचलपूर, मल्हारा, म्हसोना, वझ्झर, काळवीटसह तालुक्यातील अनेक गावात पाउस पडला. यात शहराचा वीज पुरवठाही खंडीत झाला. जुळ्या शहरासह अचलपूर तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसासह गारपीट झाली. यात टरबूज, कांदा, गहू , केळी आदी पिकांचे नुकसान झाले. अचलपूर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या एक हजार क्विंटल गव्हाची पोती पावसात भिजली.मेळघाटात मुसळधार पाऊस, गारपीटपरतवाडा/चिखलदरा : रविवारी दुपारी तीन वाजतापासून चिखलदरा पर्यटनस्थळावर गारपीटसह मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळ वाºयामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. मुसळधार पावसासोबतच हरभºयाच्या आकाराच्या गारा पडल्या. जवळपास दोन तासापर्यंत हा थरार सुरू असल्याने नागरिक घरात असूनही घाबरले होते. काटकुंभ येथील ग्रामपंचायत कार्यालयावर झाड उन्मळून पडले. या अवकाळी पावसाने मेळघाटातील चारोळी, मोहा, हिरडा आणि गावरान आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आदिवासींचा अधिक प्रमाणात रोजगार हिरावला गेला आहे. चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह, चिखली, काटकुंभ, सलोना, टेंभ्रूसोंडा, हतरु परिसरात हजेरी लावली. धारणी तालुक्यातही मुसळधार पाऊस कोसळला. धामणगाव रेल्वे शहरातील मुख्य चौकातील वीज खांब कोलमडल्याने शहरातील वीज गुल झाली.चांदूर बाजार तालुक्यात पाऊसचांदूर बाजार : तालुक्यात सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. यामध्ये तालुक्यात काही भागात गारपीट झाल्याची माहिती आहे. चांदूर बाजार सह माधान, देऊरवाडा भागात बोराच्या आकाराची गार पडल्याची माहिती आहे. सलग एक तास पडलेल्या पावसामुळे नाल्या तुडुंब भरल्या होत्या. तर, विजेच्या गडगडाटामुळे शहरातील विद्युत पुरवठा सुद्धा खंडीत झाला होता. या अवकाळी पावसामुळे संत्रा पिकाला धोका निर्माण झाला आहे.रिद्धपूर परिसरात गारपीटमोर्शी : तालुक्यातील अंबाडा, हिवरखेड, मोर्शी, लेहगाव, रिद्धपूर, कोळविहीर आदी परिसरात रविवारी ५.३० च्या दरम्यान वादळी वारा व मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाल्याने बळीराजाने रब्बी हंगामात काढणी योग्य झालेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले. आंबिया बहार-संत्राचे गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतात असणाऱ्या झोपड्यांची टिनपत्रे उडाली. वरुड तालुक्यामध्ये राजुरा बाजार, पुसला, शेंदूरजना घाट, हातुर्णा आदी भागात मुसळधार पाऊस पडल्याने संत्रा व कांदा पिकांचे नुकसान झाले. काढणीवर आलेला कांदा व मिरची मातीमोल झाली.
धामणगावात वादळी पाऊससायंकाळी सहाच्या सुमारास धामणगाव शहर व परिसरात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. तालुक्यात अचानकपणे मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरुवात झाली. हा वादळी पाऊस तब्बल पाऊण तासापर्यंत सुरू होता. विजेचा कडकडाट व वादळ असल्याने तब्बल एक तास वीज बंद होती.