लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन व उष्माघाताने कुणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदआरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन केले जातात. मात्र, यंदा मे महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही आरोग्य विभागाला उष्माघात कक्ष स्थापनेचा मुहूर्त मिळाला नसल्याने याचा विसर पडला की काय, असे दिसून येत आहे.मागील काही दिवसांपासून उन्ह - पावसाचा खेळ सुरू आहे. ग्रामीण भागात खरिपाच्या तयारीला वेग आला आहे. शेतकरी उन्हातान्हात शेतात राबताना उष्माघाताच्या घटना नेहमी घडतात. अशात उष्माघाताने मूत्यू झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहीली वाढत आहे. या उन्हाचा फटका नागरिकांना बसू नये म्हणून दरर्षी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र उष्माघात कक्ष स्थापन करण्यात येतो. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. ग्रामीण भागात वरूड, अमरावती, अचलपूर तालुक्यातील काही गावात व शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा अपवाद वगळला तर ग्रामीण भागात कोरोनाचा फै लाव सध्या तरी कमी असल्याचे यावरुन दिसून येते. तरीसुद्धा उष्माघात कक्षाची स्थापन न केल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरवर्षी उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र दोन खाटांचा कक्ष व आवश्यक सोई सुविधा उपलब्ध केल्या जातात. शिवाय कूलरची व्यवस्था, औषधी व आपात्कालीन स्थितीत देण्यात येणारा औषधांचा साठा तयार ठेवावा लागतो. परंतु यंदा आरोग्य विभागाला सर्व माफ तर नाही ना!, असा प्रश्न ग्रामीण भागात उपस्थित केला जात आहे.केव्हा निघणार मुहूर्त?'सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी खरिपाच्या तयारीला भर उन्हात शेतात राबराब राबत आहेत. अशातच वाढत्या तापमाणात उन्हात काम करणाऱ्या एखादा व्यक्तीला उष्माघात झाल्यास तातडीने उपचारासाठी प्राथमित आरोग्य केंद्रातील उष्माघात कक्ष आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असतो. परंतु हे कक्षच कार्यान्वित नसल्याने याला मुहूर्त कधी निघणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे.सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. अशातच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष तातडीने कार्यन्वित करण्यासाठी संबंधित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले जातील.- डॉ.दिलीप रणमले,जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती
आरोग्य विभागाला उष्माघात कक्षाचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST
मागील काही दिवसांपासून उन्ह - पावसाचा खेळ सुरू आहे. ग्रामीण भागात खरिपाच्या तयारीला वेग आला आहे. शेतकरी उन्हातान्हात शेतात राबताना उष्माघाताच्या घटना नेहमी घडतात. अशात उष्माघाताने मूत्यू झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहीली वाढत आहे.
आरोग्य विभागाला उष्माघात कक्षाचा विसर
ठळक मुद्देजिल्हा परिषद : प्राथमिक आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष