लाखोंचे नुकसान, तहसीलदारांसह दिली पदाधिकाऱ्यांनी भेट, मदतीचे आश्वासनवरूड : तालुक्यातील शिंगोरी येथेही तीन घरांना २६ जानेवारीच्या रात्री १० वाजता लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे सर्वस्व जळाले. आगीमुळे त्यांच्या अंगावरील कपडे तेवढे ठेवले आणि उघड्यावर संसार मांडण्यास बाध्य केले आहे.
ज्ञानेश्वर अलोणे , पांडुरंग अलोणे, प्रल्हादराव अलोणे यांच्या घराला लागलेली ही आग वरूड, शेंदूरजनाघाट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत सर्व काही बेचिराख झाले होते. घटनास्थळाला तहसीलदार किशोर गावंडेंसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन सदर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी केली. तिन्ही घरांत कापूस साठवून ठेवला होता. त्या १४० क्विंटल कापसाच्या ज्वाळांनी छताला असलेले टीनांचा आकार बदलला आहे. घरातील अन्न धान्य , कपडे, कृषी साहित्यासह बेचिराख झाले आहे. आगीचे कारण गुलदस्त्यात आहे. अलोणे कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी म्हणून पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, नरेंद्र पावडे, आ . देवेंद्र भुयार यांच्याकडे प्रतिनिधी मंडळाने मागणी केली आहे.