लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वर्षभर सोयाबीनला हमीभाव मिळालेला नाही, पेरणीसाठी बहुतेक शेतकरी घरगुती सोयाबीन वापरतात, ते ४० रुपये किलोने पडते. तेच सोयाबीन बियाणे कंपनीचे विकत घेतल्यास १०० रुपये किलो दर द्यावा लागतो. यामध्ये शेतकऱ्यांनी लूट होत असल्याने बीजप्रक्रिया व उगवणशक्ती तपासून घरगुती बियाणे उत्तम पर्याय ठरला आहे व बाहेरचे महागडे बियाणे विकत घेण्याची आवश्यकता नाही.
पेरणीसाठी आवश्यक सोयाबीन बियाणेसोयाबीनसाठी प्रतिहेक्टर १०० किलो बियाणे आवश्यक आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात अमरावती तालुक्यात २९,९०० क्विंटल, भातकुली ३०,१००, नांदगाव खंडेश्वर ४७,०००, चांदूर रेल्वे २४,५३५, धामणगाव रेल्वे २१,८६०, तिवसा १९,०००, मोर्शी १६,५५०, वरूड २,७४१, चांदूर बाजार १५,५००, अचलपूर ११,०००, अंजनगाव सुर्जी १५,३००, दर्यापूर १३,१००, धारणी ४,५०० व चिखलदरा तालुक्यात ७,९५६ क्विंटल बियाणे आवश्यक आहे.
सोयाबीन बियाण्यांची जिल्हा स्थिती
- प्रस्तावित क्षेत्र : २,५९,०४२
- हेक्टर लागणारे बियाणे : २,५९,४४२ क्विंटल
- उपलब्ध बियाणे : २,४१,९६० क्विंटल
"सोयाबीनचे घरगुती बियाणे हा खात्रीचा पर्याय आहे. यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. मात्र, बियाण्यांवर बीजप्रक्रिया करणे तसेच उगवण तपासणे आवश्यक आहे."- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी