अमरावती : कोरोना संसर्गामुळे कृषिउत्पन्न बाजार समितीची आमसभा ३० सप्टेंबरच्या आत होऊ शकली नाही. किंबहुना याविषयी शासनाचीच परवानगी नव्हती. त्यामुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही सभा ३१ मार्चच्या आत होण्यासाठी सहकार विभागाने मंगळवारी मुदतवाढ दिली. तसे आदेश सहकारी विभागाचे कार्यासन अधिकाऱ्यांनी मंगळवारी जारी केले.
कृषिउत्पन्न बाजार समितीच्या अधिनियमानुसार वित्तीय वर्षाच्या अखेरीस व सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये म्हणजेच ३० सप्टेंबरच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे महत्त्वाचे आहे. मात्र, राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. त्यानंतर यामध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सर्वसाधारण सभा बोलाविणे उचित नसल्याने ती पुढे ढकलण्यात आली होती. आता महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मधीळ कलम ५९ अन्वये या अधिनियमातील १९६३ मधील नियम २७ (अ) नुसार आमसभा घेण्यास ३१ मार्च २०२१ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.