अहवाल सादर : अस्तरीकरण ठिकठिकाणी फुटलेअमरावती : तिवसानजीक उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावर पुलाखाली अस्तरीकरणाला असणाऱ्या भगदाडाची पाहणी कालवे उपविभाग क्र. १ च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी केली. याचा अहवाल विभागाला सादर करण्यात आला आहे. तसेच कालव्यावर ठिकठिकाणी फुटलेल्या अस्तरीकरणाच्या कामांचे अंदाजपत्रक बनविण्याच्या सूचना अभियंता पी. डी. सोळंके यांनी दिल्यात. ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात याविषयीचे वृत्त प्रकाशित केले होते. तिवसा गावाजवळून जाणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पावर असणाऱ्या गाव रस्ता पूल (व्हिआरबी) ४५/९२३ या पुलाखाली असलेल्या अस्तरीकरणाला मोठे भगदाड पडल्याने पूल धोक्यात आल्याची शंका अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. तसेच या मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणाला ठिकठिकाणी भगदाड पडलेली आहे यामुळे अस्तरीकरणाच्या मुख्य उद्देशालाच तडा जाऊन शेती पुन्हा पाझरण्याची शक्यता आहे. या विषयी उर्ध्व वर्धा कालवे उपविभाग क्र. १ चे उपअभियंता पी. डी. सोळंके, शाखा अभियंता जावरेकर, सहा. अभियंता हिरूळकर, कनिष्ठ अभियंता ताकपीरे, तांत्रिक सहाय्यक मोरेश्वर देशमुख यांनी पाहणी केली व तसा अहवाल डिव्हीजन कार्यालयास सादर केला. तसेच मुख्य कालव्यावर ठिकठिकाणी असलेली भगदाड बुजविण्यासाठी कामांचे अंदाजपत्रके बनविण्याच्या सूचना अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. कालवे विभागाला मिळालेल्या पॅकेजच्या निधीमधून ही कोट्यवधींची कामे करण्यात आली होती. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्यामुळे अस्तरीकरणाला ठिकठिकाणी भगदाड पडत आहे. मुख्य कालव्याला तिवसा तालुक्या परिसरात अस्तरीकरणाची कामे होऊन अमरावती कालवे विभाग क्र. १ तसेच कुऱ्हा येथील उपविभागीय कार्यालयांतर्गत करण्यात आली होती. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे.लोकमतइम्पॅक्ट
मुख्य कालव्याच्या भगदाडाची अभियंत्यांनी केली पाहणी
By admin | Updated: July 24, 2015 00:14 IST