चांदूररेल्वे/तळेगाव : लग्नाच्या तिसर्या दिवशीच नवर्या मुलाची व नातेवाईकांची नजर चुकवून नववधूने प्रियकरासोबत पलायन केल्याची घटना तालुक्यातील सातेफळ येथे बुधवारी दुपारी घडली. प्रियकरासह नववधूला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. सातेफळ येथील तरुणीचा विवाह दारव्हा येथील नीलेश महादेव शेलोकार या युवकासोबत ठरला होता. १२ मे रोजी सातेफळ येथे वधूमंडपी धुमधडाक्यात विवाह सोहळा पार पडला. सायंकाळी नवरी मुलीचा ‘बिदाई’चा कार्यक्रम पार पडला. मुलीला सासरी पाठविताना तिच्या आई-वडील आणि इतरांचेही मन भरुन आले. त्यानंतर ही नववधू वरासह दारव्हा येथे पोहोचली. त्या ठिकाणीही नववधूचे पारंपरिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. मुलाकडील सत्यनाराणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नीलेश दुसर्या दिवशी या नवधूला घेऊन तिच्या माहेरी म्हणजे सातेफळ गावात घेऊन आला. १४ मे रोजी मुलीकडेही सत्यनाराणाच्या पूजेचा कार्यक्रम पार पडला. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. घरासमोर जेवणावळ सुरु होती. ज्येष्ठ मंडळी एकमेकांच्या भेटी-गाठी आणि चर्चेत मग्न होते. महिला मंडळीही एकमेकींच्या ख्यालखुशालीत मग्न होत्या. दरम्यान नववधू व तिच्या प्रियकरामध्ये कधी संवाद साधल्या गेला आणि कधी पळून जाण्याची योजना आखली याची पुसटशी कल्पनाही घरच्या मंडळींना नव्हती. १४ मे रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नववधू व तिच्या प्रियकरामध्ये तयार केलेल्या योजनेप्रमाणे प्रियकराने तिच्या घराच्या मागील बाजुला चार चाकी वाहन आणून उभे केले. नववधूने वेळीच संधी साधून घरातून मागच्या दाराने पळ काढून प्रियकराच्या वाहनाने पोबारा केला. काही वेळानंतर नवरी मुलगी दिसत नसल्याचे पाहून शेजार्यांकडे तिचा शोध घेणे सुरु झाले. तिच्या मैत्रींकडेही शोधाशोध सुरु झाली. या प्रकरणाची कुजबूज लग्नमंडपातील पाहुणे मंडळींपर्यंत पोहोचली. काही वेळानंतरच सत्य उघड झाले आणि दोन दिवसांपूर्वी बोहल्यावर चढलेली वधू प्रियकरासोबत पळाल्याचे निश्चित झाली. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच वर नीलेशने थेट तळेगाव दशासर पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली. तत्पूर्वी मुलीच्या वडिलांनीही आपली मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. पोलिसांनी याघटनेची माहिती ‘वारलेस’हून सर्व पोलीस ठाण्याला देण्यात आली. बुधवारीच रात्री नववधू व तिचा प्रियकर ज्ञानेश्वर किसन ढोणे (२६, जळका जगताप) हे दोघे औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ही माहिती तळेगाव पोलिसांना मिळाली. पोलीस पथक औरंगाबादकरिता रवाना झाले. वृत्त लिहिस्तोवर कारवाई सुरु होती.
लग्नाच्या तिसर्याच दिवशी नववधूचे पलायन
By admin | Updated: May 15, 2014 23:05 IST