शिवसैनिकांचा लढा: पीक नुकसानीची मागणीधामणगावरेल्वे : तालुक्यात मागील एक महिन्यांपासून पाऊस नसल्याने दुष्काळजन्य स्थिती असल्याने धामणगावरेल्वे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने स्थानिक तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.यंदा पाऊस उशीरा आल्याने खरीप हंगामातील पेरणीही उशीरा झाली. सतत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिकरितीने डबघाईस आला आहे. दुबार व तिबार पेरणी केल्यावरही पावसाने दडी मारल्यामुळे आता उपासमारीची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. धामणगावरेल्वे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे बाबा ठाकुर, बाल्या राऊत, सुभाष लाबर, राजु भेले, संदीप पिपळे, संजय जांगडा, उमेश इंंगोले, आशिष दगडकर, गणेश गुप्ता, मुन्ना गुप्ता, सुरेंद्र चौहाण, उमेश भुजाडने यांनी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. तालुक्यात गेल्या एक महिन्यांपासून पाऊस नसल्यामुळे पिके सुकू लागली आहे. सतत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आत्महत्येकडे वाटचाल करीत आहे. तालुक्यात कोणताही उद्योग नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करुन संत्रा, सोयाबिन, कपाशी,तूर, मूग, तिळ, ज्वारी या पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्वरीत द्यावी अशी मागणीही शिवसैनिकांनी यावेळी केली. आंदोलनात असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
दुष्काळ : अर्धनग्न आंदोलन
By admin | Updated: August 19, 2014 23:27 IST