घाबरू नका, ८७ रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:01:14+5:30
जिल्ह्यात व प्रामुख्याने महानगरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी व्यापक प्रमाणात होत आहे. याला नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद आहे. आता कोरोनामुक्त घोषित करण्यासंदर्भात ‘आयसीएमआर’ने ९ मे रोजी नव्या गाइड लाइन दिल्या आहेत. त्यानुसार संक्रमित व्यक्तींना प्रथम पाच दिवस औषधांचा कोर्स दिला जातो. त्यानंतर पाच दिवस निरीक्षणात ठेवल्या जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती असली तरी उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण त्यापेक्षाही कितीतरी जास्त असल्याचे दिलासादायक चित्र आहे. सद्यस्थितीत कोविड रुग्णालयात ८३ संक्रमित व्यक्तींवर उपचार सुरू आहेत, त्याच्या तुलनेत ८७ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. हे प्रमाण आतापर्यंत नोंद झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या ४८ टक्के आहे. सद्यस्थितीत दाखल रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त असल्याचे सुखद चित्र शहरासह जिल्ह्यात आहे.
जिल्ह्यात व प्रामुख्याने महानगरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी व्यापक प्रमाणात होत आहे. याला नागरिकांचाही सकारात्मक प्रतिसाद आहे. आता कोरोनामुक्त घोषित करण्यासंदर्भात ‘आयसीएमआर’ने ९ मे रोजी नव्या गाइड लाइन दिल्या आहेत. त्यानुसार संक्रमित व्यक्तींना प्रथम पाच दिवस औषधांचा कोर्स दिला जातो. त्यानंतर पाच दिवस निरीक्षणात ठेवल्या जाते. अहवाल निगेटिव्ह आल्यास व लक्षणे नसल्यास त्यांना सुटी दिली जाते. मात्र, पुढील सात दिवस त्यांना गृह विलगीकरणात राहावे लागते. केवळ आयसीयूमध्ये असणाऱ्या व्यक्तींनाच रुग्णालयात ठेवले जात आहे. उपचाराच्या परिणामी सात वर्षाच्या चिमुरडीसह ७० वर्षाच्या आजी उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्या. मंगळवारी चौघे कोरोनामुक्त झाले आले.
आरोग्य यंत्रणाद्वारे उपचारानंतर बरे झालेल्या व्यक्तींचे जिल्हा व आरोग्य प्रशासनाद्वारे पुष्पगुच्छ व मिठाई देऊन तसेच टाळ्या वाजवून स्वागत केले गेले. तत्पूर्वी, त्यांच्याकडून सात दिवस गृह विलगीकरणात राहण्याविषयी हमीपत्र लिहून घेतले. या कालावधीत त्यांनी काय करावे, काय करू नये, याविषयी कोरोनामुक्त झालेल्यांना माहिती दिली गेली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.
जिल्ह्यात असे झाले कोरोनामुक्त
अमरावती शहरातील ताजनगर १२, खोलापुरी गेट ९, मसानगंज ६, हनुमाननगर ६, हैदरपुरा ५, बडनेरा ४, कमेला ग्राऊंड ४, नालसाबपुरा ४, हाथीपुरा ३, लालखडी ३, तारखेडा ३, कंवरनगर ३, हबीबनगर २, एसआरपीएफ कॅम्प २, गौसनगर १, सुफियाननगर १, कॉटन मार्केट १, आझादनगर १, बेलपुरा १, अंबिकानगर १, खरकाडीपुरा १, सिंधुनगर १, नांदगाव पेठ १, याशिवाय जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिराळा ४, वरूड ३ व परतवाडा येथील १ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झालेला आहे.
दक्षता महत्त्वाची
कोरोनासंदर्भात दक्षता महत्त्वाची आहे. चेहºयावर मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, गर्दी टाळणे, सॅनिटायझरने हात धुणे, सॅनिटायझर नसल्यास हँडवॉश, साबणचा वापर करुन आरोग्य यंत्रणेकडून सांगितल्याप्रमाणे हात धुणे याशिवाय शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. घरीच राहा, सुरक्षित राहा, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.
उपचारादरम्यान रुग्णालयातील स्टाफने सहकार्य केले. आमचे मनोबल वाढविले. योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो. नागरिकांनी कुठलीही लक्षणे दिसली की, तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. कुठलीही माहिती लपवू नये.
- कोरोनामुक्त नागरिक
हाथीपुरा