विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये वाढली चिंता, २१ प्रवर्गातील विद्यार्थ्यांची समस्या ऐरणीवर
अमरावती : दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे;मात्र दिव्यांगांना परीक्षा देण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लेखनिक मिळणे कठीण झाले आहे. बालकांना मोफत, सक्तीचा अधिकार अधिनियमानुसार शिक्षण हा प्रत्येक बालकांचा मूलभूत हक्क आहे. वयाच्या सहा ते १४ वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकाला व विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण विषयक सुविधा देणे आवश्यक आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार, सामाजिक शिक्षण संकल्पनेनुसार अध्ययन दृष्टिकोनातून ग्रामीण दुर्गम, अतिदुर्गम, निमशहरी व शहरी भागात इयत्ता पूर्वप्राथमिक ते गरजा असणाऱ्या अंशत: अंध, पूर्णत: अंध, कर्णबधिर, भाषा व वाचा दोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार, अध्ययन अक्षम, सेंरब्रल पाल्सी, स्वमग्र, बहुविकलांग, क्रृष्ट रोगनिवारित, शारीरिक वाढ खुंटणे, बौद्धिक अक्षम,गतिमंद विकृती, मज्जासंस्थेचा तीव्र आजार,मल्टिपल स्केलेरोसिस, थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल आजार, ॲसिड अटॅक, विक्टिम, पार्किनसन्स आजार आदी २१ प्रवर्गातील व इतर आव्हानात्मक परिस्थिती आढळून आलेली बालके शिक्षणापासून वंचित राहू नयेत, तसेच त्यांना सर्वांसोबत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना अध्ययन, साहाय्यभूत सेवा अनुकूलित परीक्षा, मूल्यांकन पद्धती व शिक्षकांना मार्गदर्शन तसेच क्षेत्रीय यंत्रणा व समुदायाचे सक्षमीकरण हे प्रमुख उद्दिष्ट आहे. राज्य प्राथमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेस बसणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकारचे सांकेतांक कोडिंग त्यांच्या उत्तरपत्रिका होणे गरजेचे आहे. त्यानुसार आवश्यक कार्यवाही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे करण्यात यावी, असेही परिपत्रकात नमूद आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रतितास २० मिनिटे अधिक वेळ राहील. इतर आजारामुळे शाळेत शिक्षणासाठी अडचणीत येणारे विद्यार्थी आदींचा समावेश आहे. लेखनिक उपलब्ध होत नसल्यास प्रौढ लेखनिक घेता येईल. अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऐनवेळी लेखनिक देण्याबाबतचा निर्णय संबंधित सेंटर प्रमुखांना आहे. आपले मूल कोणत्या विशेष गरजा असणाऱ्या शैलीचे आहे व त्यांना कोणती शाळा परीक्षा केंद्र म्हणून देण्यात आली. याची पूर्व माहिती व परीक्षा ओळखपत्र घेऊन परीक्षा सुरू होण्यास सात दिवसांपूर्वी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांची भेट पालकांनी घेऊन पाल्याबाबत पूर्व कल्पना देणे आवश्यक आहे.
-----------------------
पालक काय म्हणतात...
‘‘ कोराेनाचा प्रभाव वाढत असून, शाळाही बंद आहेत.दहावी परीक्षेच्या वेळी मुलांची गर्दी सेंटरवर राहणार आहे; मात्र या कोरोनामुळे लेखनिक मिळणे कठीण जात आहे. पेपर सोडवायला कोणीच तयार होत नसल्याने आता चिंता वाढली आहे.
- आत्माराव पापळकर, दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक.
‘‘ मुलाला लेखनिक मिळावा, याबाबत मुख्याध्यापकांशी चर्चा करण्यात आली;मात्र पेपर सोडविण्यासाठी तयार होत नाही. त्यामुळे मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.
- शरद पेंदाम, पालक.
‘‘ माझ्या मुलास लेखनिक देण्याबाबत शाळेने चर्चा केली. पण, कोरोनामुळे कोणीही पेपर सोडविण्यासाठी तयार होत नसल्याने अडचण निर्माण होत आहे.
- रशीदा बानो मोहम्मद युसूफ, पालक
-----------------
‘‘ दहावी, बारावी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या लेखनिक संबंधातली ही कार्यवाही पालक आणि शाळा यांनी करावयाची आहे. शाळांना शासन निर्देश पाठविले आहे. त्यानुसार कार्यवाही करून बोर्डाकडे परवानगीसाठी पाठवावे लागते. सध्या शाळा बंद असल्याने अडचण येत आहे. काही शाळांनी बोर्डाकडे अर्जही सादर केले आहे.
- प्रिया देशमुख, उपशिक्षणाधिकारी, अमरावती.
-------------------
विभागात दहावीचे दिव्यांग परीक्षार्थी - ७३८
बारावीचे दिव्यांग परीक्षार्थी- ६५८