--------------
सर्वसामान्यांना दिलासा देणारे हा कोरोनाकाळातील अर्थसंकल्प आहे. दरवाढीचा विस्फोट थांबविण्यासाठी अनेक तरतुदी केंद्र शासनाने केल्या आहेत. त्यामुळे व्यापारवृद्धीला आगामी काळात चालना मिळेल. पेट्रोल, डिझेल दरांचे नियंत्रणच सरकारकडे नाही, तर त्याचे नियमन कसे होणार? या अर्थसंकल्पाने कोरोनापश्चात देशांतर्गत चलन खेळते राहील.
- मिथून निशान, किराणा व्यापारी, अर्जुननगर
--------------
‘आत्मनिर्भर भारत’कडे वाटचाल करणारा केंद्रीय अर्थसंकल्प पहिल्यांदा एका खमक्या स्त्रीने सादर केला आहे. अर्थसंकल्पानंतर पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याकडे कल असतो. मात्र, यंदा हे इंधनाचे दर स्थिर राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या सेसमध्ये वाढ केल्यामुळे त्यांनाही दिलासा मिळेल.
- रविराज देशमुख, पेट्रोल पंप चालक
--------
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य समस्या सुसह्य करण्यासाठी नऊ टक्क्यांपर्यंत तरतूद करण्यात आली. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. पर्यटन क्षेत्रात सूट मिळाली असती, तर हा आनंद द्विगुणित झाला असता. एकंदर अर्थसंकल्प चांगला आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही कोरोना लसीकरणात राखीव कोटा असायला हवा होता.
- डॉ. विजय कळंबे, ज्येष्ठ नागरिक, अर्जुननगर
------------
अर्थसंकल्पात गरीब, सामान्यांसाठी काहीच नाही. केवळ आकड्यांचा खेळ आहे. कामगार, शेतमजूर, बेरोजगारांसाठी भरीव पॅकेज नाही. मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्यांसाठी अर्थसंकल्पाने दिलासा दिला नाही. गरीब गरीबच आणि श्रीमंत श्रीमंतच होतील, हे या अर्थसंकल्पाने निर्देशित केले.
- अशफाक खान, ऑटोचालक, अमरावती
--------------
शेतकऱ्यांसाठी मोठा गाजावाजा करीत अर्थसंकल्प सादर झाला असला तरी सर्वसामान्य व किरकोळ व्यापारी, भाजी विक्रेत्यांसारख्या किरकोळ घटकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प नाही. उपकरामुळे भाजीपाला महाग होईल. विशिष्ट वर्गाचे हित जोपासण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.शेवटच्या माणसाला अर्थसंकल्पात पारसे स्थान देण्यात आलेले नाही.
- अजय भालेराव, भाजीपाला विक्रेता, बडनेरा
----------------
सिलिंडर व भाज्यांचे दर कितपत स्थिर राहतात, यावरच अर्थसंकल्पातील तरतुदींचे यशापयश राहणार आहे. स्वयंपाकगृह सांभाळताना खर्चाबाबत नाकीनऊ येत आहेत. वरकरणी तरतुदी दिलासादायक दिसत असल्या तरी त्यावर अंमलबजावणी आवश्यक आहे.
- पूनम वंदे, गृहिणी, न्यू फ्रेन्ड्स कॉलनी
-------------
कोरोनामुळे हॉटेल बंद होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. अर्थसंकल्पात पर्यटनावर भर देण्यात आला आहे. मात्र, हॉटेल व्यावसायिकांसाठी सवलततीच्या थेट घोषणा नाहीत. हा अर्थसंकल्प उद्योजकांच्या फायद्याचा नाही.
- नितीन कदम, उद्योजक, अमरावती
--------------
जोड येत आहे.