उन्हाळ्यात होतो मोह : बर्फ मात्र धोकादायकच अमरावती : मार्च संपत नाही तोच पारा ४३ अशांपर्यंत पोहोचलाय. तापत्या उन्हात आपसुकच थंड पाणी आणि शीतपेयांची लालसा उत्पन्न होते. लिंबू सरबत, कोल्डड्रींक्स आणि इतर शितपेयांच्या गाड्यांकडे पावले वळतात. उन्हामुळे शुष्क झालेल्या घशात मग आपोआपच एका ऐवजी दोन ग्लास शितपेये ओतली जातात. त्यातल्या त्यात उन्हाळ्यात आरोग्यदायी समजले जाणारे निंबू सरबत नागरिकांना खास आकर्षित करते. परंतु हे सरबत पित असताना आपण धोकादायक द्रव्य तर शरीरात ओतत नाही ना, याची खात्री करून घेण्याची गरज आहे. सरबत बनविताना दूषित पाण्याचा वापर केला असल्याने हे सरबत पिल्याने यामुळे टायफाईड व गॅस्ट्रोइंट्रायस्टिट सारखे आजार होऊ शकतात. लिंबूपाणी तयार करताना वापरण्यात येणारा बर्फ जर दूषित पाण्यापासून तयार केलेला असेल तर यामुळेही अनेक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे शितपेय, लिंबूपाणी रिचवताना सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचा सल्ला येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना दिली आहे. लिंबूमध्ये ‘सायट्रिक अॅसिड’ व व्हीटॅमीन ‘सी’ असल्यामुळे ते आरोग्याला अतिशय पोषक असते. त्यामुळे अन्नपचनास मदत होते. तसेच शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते. त्यामुळे लिंबूपाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी गरजेचे असते. कोल्डड्रींकपासून शरीरावर होणाऱ्या विपरीत परिणामांवर बरेच मंथन आणि जनजागृती होत असल्याने सावध झालेल्या नागरिकांनी त्यांचा मोर्चा लिंबू सरबताच्या गाड्यांकडे वळविला आहे. कमी गुंतवणुकीत जादा फायदा मिळविण्यासाठी बरेच विक्रेते दूषित पाणी व निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा वापर करतात. यामुळे रोगराई झपाट्याने पसरू शकते. याहीपेक्षा घातक प्रकार म्हणजे काही ठिकाणी तर येथील श्वविच्छेदन केंद्रात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या लादीचा देखील सरबतासाठी मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याची चर्चा आहे.लिंबू पाण्यामधून मनुष्याला ‘व्हीटॅमिन सी’ मिळते. परंतु दूषित पाण्याचा वापर त्यामध्ये होत असेल तर टायफाईड, गॅस्ट्रोइंट्रायस्टिट सारखे अनेक आजार बळावू शकतात. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. - प्रवीण बिजवे, शल्यचिकित्सक अमरावती
सावधान ! लिंबू सरबतही घातक
By admin | Updated: April 2, 2017 00:12 IST