तिवसा (जि. अमरावती) - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी बच्चू कडू यांनी ८ जूनपासून गुरुकुंजात राष्ट्रसंतांच्या महासमाधीपुढे अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी सायंकाळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणस्थळी दाखल होत बच्चू कडू यांची भेट घेतली. परंतु मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच उपोषण थांबविण्याचा निर्णय घेणार असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितले.
कडू यांच्या उपोषणाचा शुक्रवारी सहावा दिवस होता. पालकमंत्री तोडगा घेऊन येतील, अशी आशा वर्तविण्यात येत होती. परंतु, त्यांच्या आश्वासनांना दाद न देता बच्चू कडू ठाम राहिले. काँग्रेस व शरद पवार गटाने या उपोषणाला पाठिंबा दिला.
मुख्यमंत्र्यांशी संवादपालकमंत्र्यांनी बच्चू कडू यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद करून दिला. यावेळी दिव्यांगांच्या मानधन वाढीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी लवकरच एक समिती गठित करण्यात येईल. कर्जाची वर्गवारी तयार करून अहवाल शासनाला सादर करण्यात येईल. येत्या पावसाळी अधिवेशनात त्याबाबत सरकार निर्णय घेईल, असे मंत्री बावनकुळे म्हणाले.