शेतकरी आत्महत्या : भावाने सावरले भावाचे कुटुंबश्याम कळमकर भंडारजसद्यस्थितीत शेतकरी आत्महत्या हा विषय गाजवतोय. शेतकरी आत्महत्या करण्यामागे अनेक कारणे असली तरी त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांच्या वाट्याला येणाऱ्या वेदना, यातना आणि हालअपेष्टा मात्र अपरिमित असतात. अकाली कर्ता पुरूष निघून गेल्यानंतर उघड्यावर पडलेले कित्येक संसार आजही सावरलेले नाहीत. पण, अंजनगावात मोठ्या भावाच्या आत्महत्येनंतर उघड्यावर आलेले त्याचे कुटुंब सावरण्यासाठी लहान भावाने उचललेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आणि आदर्श असे आहे. २०१० साली अंजनगाव सुर्जी येथील नरेंद्र प्रल्हाद ताडे नामक एका तरूण शेतकऱ्याने भंडारज-अडगाव मार्गावरील स्वत:च्याच शेतातील झोपडीत विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. मागे राहिली ती त्याची पत्नी दीपाली आणि दोन वर्षांचा मुलगा सारंग. विशाल जगात निराधार जगावे कसे, असा प्रश्न दीपालीसमोर उभा होता. मात्र, महेंद्र ताडे नरेंद्रचा लहान भाऊ याने क्रांतिकारी पाऊल उचलले. त्याने भावाचा उघड्यावर पडलेला संसार सावरण्याचा निर्णय घेतला आणि दीपालीसोबत विवाह केला. आज तीन वर्षांपासून त्यांचा संसार सुस्थितीत बहरला आहे. दीपालीच्या उद्ध्वस्त आयुष्यात वसंत फुलला आहे. समाजानेही दीपाली आणि महेंद्रच्या विवाहाला मूकसमंती आणि मूकसन्मानही दिला. अंजनगाव सुर्जी येथे बहुसंख्य बारी समाज आहे. शेती, शेतमजुरी, विड्याच्या पानांची विक्री आणि पानपिंपरी असा येथील नागरिकांचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे. आजही या समाजाकडे अशिक्षित अडाणी समाज म्हणून पाहिले जाते. परंतु या समाजातील युवकाने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे एक उद्ध्वस्त संसार पुन्हा फुलला, हे वास्तव आहे. महेंद्र आणि दीपालीचा संसार वेलीवरही आता नीरज नावाचे एक फूल उमलले आहे. परिस्थितीशी झगडून एक दु:खी संसार आज बहरतो आहे.
अन् त्या उद्ध्वस्त बागेत फुलला वसंत !
By admin | Updated: October 5, 2015 00:32 IST