पावसाळ्यातही १०१ खासगी विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 05:00 AM2020-06-17T05:00:00+5:302020-06-17T05:01:31+5:30

यावर्षी सुरुवातीपासूनच ग्रामीण भागाला पाणीटंचाईची झळ पोहोचणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई आराखडा तयार करून मंजूर करून घेतला होता. जानेवारी ते मार्च या पहिल्या टप्प्यात काही गावांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले होते. मे महिन्यात त्याची तीव्रता वाढली. परिणामी या महिन्यात २२ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला. आता पुन्हा यात दोन टँकरची भर पडली आहे.

Acquisition of 101 private wells even during monsoon | पावसाळ्यातही १०१ खासगी विहिरींचे अधिग्रहण

पावसाळ्यातही १०१ खासगी विहिरींचे अधिग्रहण

googlenewsNext
ठळक मुद्देटंचाईच्या झळा कायम : २४ गावांची तहान टँकरवर, ६० विंधन विहिरी; दमदार पावसाची प्रतीक्षा

जितेंद्र दखने।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पावसाळा सुरू झाला आहे. मात्र, अद्यापही ग्रामीण भागातील १०१ गावांतील नागरिकांना अधिग्रहित खासगी विहिरी तसेच ६० विंधन विहिरींच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. २४ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यावरून पावसाळ्यातही पाणीटंचाईची जिल्ह्यातील तीव्रता स्पष्ट होते.
यावर्षी सुरुवातीपासूनच ग्रामीण भागाला पाणीटंचाईची झळ पोहोचणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई आराखडा तयार करून मंजूर करून घेतला होता. जानेवारी ते मार्च या पहिल्या टप्प्यात काही गावांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले होते. मे महिन्यात त्याची तीव्रता वाढली. परिणामी या महिन्यात २२ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला. आता पुन्हा यात दोन टँकरची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक २१ गावे ही चिखलदरा तालुक्यातील असून, अचलपूर व चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. विविध तालुक्यांतील १०१ खासगी, तर ६० विंधन विहिरी अधिग्रहण करू न नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. याशिवाय बोअरवेलची ३५८ पैकी २३१ कामे पूर्ण झाली आहेत. यासोबतच इतरही कामे मंजूर केली आहेत. मात्र, ही कामे अजून पूर्ण व्हायची आहेत.
सदर कामे ३० जूनपूर्वी करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या अधिनस्थ यंत्रणेमार्फत संबंधितांना दिले आहेत. सध्या तरी दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची स्थिती कायम आहे. वातावरणात काहीसा बदल जाणवत असला तरी दमदार पाऊस झाल्यानंतरच पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, औद्योगिक व इतर कारणांसाठी वापर कमी झाला. तरीही काही गावांमध्ये पाणीटंचाई होती. आता या गावांतील नागरिकांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा आहे.

या गावांना विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी
अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, चिखलदरा तालुक्यात एकझिरा, बगदरी, सोनापूर, सोमवारखेडा, खंडुखेडा, तारुबांदा, मलकापूर, आकी, धरमडोह, बहादरपूर, तोरणवाडी, खोंगडा, कोरडा (हनुमानढाणा), काला पांढरी, मोथा, मनभंग, कोयलारी, पाचडोंगरी, केली, बारलिंगा, कोरडा आणि चांदूर रेल्वेमधील सावंगी मग्रापूर या गावांना २४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यात १९, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १८, चिखलदरा तालुक्यात १७, अमरावती तालुक्यात १३, मोर्शी व वरूड तालुक्यांमध्ये प्रत्येकी ९, तिवसा तालुक्यात ७, धारणी तालुक्यात ३, धामणगाव रेल्वे तालुक्यात ३, चांदूर बाजार तालुक्यात २, अचलपूर तालुक्यात १ अशा खासगी १०१ व ६० विंधन विहिरींचे अधिग्रहण केला गेले आहे.

लॉकडाऊनच्या काळातही ज्या ठिकाणी पाणीटंचाई होती, अशा ठिकाणी टंचाईचे निवारण करून पाणीपुरवठा करण्यात आला आहे. यानंतरही काही गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाईच्या तक्रारी आहेत. अशा ठिकाणी नळाला मोटारी लावू नये, याकरिता सूचना दिल्या आहेत. नळांना तोट्या बसविण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना दिल्या आहेत.
- राजेंद्र सावळकर, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग

Web Title: Acquisition of 101 private wells even during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी