रामदास आठवले : अपंगांना उपयुक्त साहित्य वाटपअमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने 'सुगम्य भारत' योजना केली आहे. याद्वारे कर्णबधिर, मूकबधिर, नेत्रहीन, अस्थिव्यंग अशा दिव्यांगांचे व्यंग दूर करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात 'सुगम्य भारत योजना' अपंगांसाठी एक मोलाचा आधार ठरेल, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.बडनेरा मार्गालगतच्या संत गाडगे महाराज विद्यालय, नवाथेनगर येथे अपंग जीवन विकास संस्थाद्वारा संचालित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू अपंगांना उपयुक्त साधन वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रवीण पोटे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अपंग जीवन विकास संस्थेचे किशोर बोरकर, पुष्पा बोंडे, माजी आमदार अनिल गोंडाणे, पी.एस. खडसे, सुभाष गवई, नगर सेवक प्रकाश बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत, समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण आदी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने ना. आठवलेंचा सत्कार करण्यात आला. ना. आठवले पुढे म्हणाले, केंद्रीय राज्यमंत्री म्हणून देशाच्या हितासाठी कार्य करीत असताना येथील प्रत्येक घटकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचला पाहिजे, शासकीय नोकऱ्यांमध्ये अपंगांचा अनुशेष दूर करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अपंगांना न्याय मिळाल्यास जिल्ह्यातील ७७ हजार अपंग बांधव आणि त्याच्या परिवाराचे पुनर्वसन होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी किशोर बोरकर यांच्या कार्याची प्रसंशा केली. संचालन जगदीश गोवर्धन, आभार वसुंधरा बोरकर यांनी मानले.५० अपंगांना साहित्य वाटपकेंद्रीय न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले तसेच समारोहास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ५० गरजू अपंगांना उपयुक्त साधनांचे वाटप करण्यात आले. शेख मेहमूद, शेख अशफाक, भीमराव वानखडे, संदीप मोहिते, श्रीकांत खैरकर, मनोहर वाडस्कर, मोहम्मद मुजीम, संदीप गवई, हरी मदने, जनार्दन धंदर, पद्मीनी वाखलेंसह सर्र्वांना तीनचाकी सायकलीचे वाटप करण्यात आले.
सुगम्य भारत योजना दिव्यांगांना आधार
By admin | Updated: October 10, 2016 00:17 IST