लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना लसीकरणानंतरही संक्रमित रुग्णांची आकडेवारी दिवसागणिक उच्चाक प्रस्थापित करीत आहे. मंगळवारी ४८५ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, ही नोंद आतापर्यंत विक्रमी ठरली आहे, तर तिघांच्या मृत्यूनंतर कोरोना रुग्णांची मृत्युसंख्या आता ४४२ वर पोहोचली आहे.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ४ एप्रिल २०२० रोजी आढळून आल्याची नोंद करण्यात आली. मार्च २०२० ते १६ फेब्रुवारी २०२१ दरम्यान मंगळवारची एका दिवसात ४८५ संक्रमित रुग्णसंख्या ही विक्रमी ठरली आहे. यापूर्वी २३ सप्टेंबर २०२० रोजी ४६३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. नवीन वर्षात जानेवारीपासून पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासमोर चिंता वाढली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १२ फेब्रुवारी रोजी संचारबंदीचे आदेश जारी केले. मात्र, त्यानंतरही दरदिवशी कोरोना संक्रमितांचे निदान तीव्र गतीने होत आहे. कोरोना का कमी होत नाही, याचा शाेध घेण्यात आरोग्य यंत्रणाही नापास झाली आहे. गत सात दिवसांत २,७५२ कोरोना पॉझिटिव्ह ही संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे.
मंगळवारी पॉझिटिव्ह २८.३६ टक्के आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, मंगळवारी ४८५ संक्रमित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाकाळातील ही विक्रमी नोंद आहे. १ हजार ७१० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४८५ पॉझिटिव्ह आढळून आले असून, २८.३६ टक्के एवढे पॉझिटिव्हिटीचे प्रमाण आहे.
१६ दिवसांत २४ रुग्णांचा मृत्यूनवीन वर्षात कोराना संक्रमित रुग्ण वाढत असताना, मृत्युसंख्याही धोकादायक ठरत आहे. सोमवारी चौघांचा, तर मंगळवारी तिघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ४४२ कोरोनाग्रस्त दगावले. १ ते १६ फेब्रुवारी या १६ दिवसांत २४ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ५ ते ७ फेब्रुवारी हे तीन दिवस वगळता सतत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मृत्यूची संख्या प्रकाशित होत आहे.