लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या माता रुक्मिणीच्या पालखीचे अंबानगरीत बियाणी चौकात माजी आमदार अॅड. यशोमती ठाकूर, तसेच खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सोहळ्याकरिता सर्वच धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने सोहळा सामाजिक समतेचा वारसा जपणारा ठरला.
रुक्मिणी मातेच्या पालखीला ४३१ वर्षांची परंपरा आहे. श्रीक्षेत्र पंढरपूरच्या धर्तीवरच रुक्मिणी मातेचेही शासकीय पूजन व्हावे व श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीप्रमाणेच रुक्मिणी मातेच्या पालखीलाही मानाचे स्थान मिळावे, यासाठी माजी आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी भगीरथ प्रयत्न केले होते. त्यानुसार आता श्रीक्षेत्र पंढरपूर येथे रुक्मिणी मातेचे शासकीय पूजन व सोबतच या पालखीला पंढरपूर येथे मानाची पालखी असा दुग्धशर्करा योग घडून आला आहे.
पालखीत स्वागत सोहळा ठरला सर्वधर्मसमभावाचा सोहळाया सोहळ्यात सर्व समाजातील नागरिक आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे हा पालखी स्वागत सोहळा सर्वधर्मसमभावाचे आणि एकतेचे दर्शन घडवणारा ठरला. सोहळ्याला खा. बळवंत वानखडे, यश खोडके, पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, आरडीसी अनिल भटकर, पोलिस उपायुक्त सागर पाटील, अमरावती बाजार समितीचे सभापती हरीश मोरे, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, कल्पना दिवे, जयंत देशमुख, हरिभाऊ मोहोड, मनोज देशमुख, प्रवीण मनोहर, प्रकाश काळबांडे, प्रताप भुयार, अमित गावंडे, नितीन कदम, सतीश गोटे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बियाणी चौकात भक्तिरसाला उधाणबियाणी चौकात सायंकाळी ७ वाजता रुक्मिणी मातेच्या पालखीचे आगमन होताच माजी आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते व भाविकांच्या उपस्थितीत पालखीचे जल्लोष आणि भक्तिभावात स्वागत करण्यात आले. पालखी आणि भक्तीरसात तल्लीन झालेले वारकरी, सोबत टाळ-मृदंग आणि मुखात विठ्ठलाचे नाम असा मंगलमय सोहळा पार पडला. हा प्रसंग भाविकांसाठी आनंदाची पर्वणी ठरला.
यशोमती ठाकूर यांनी धरला फुगडीचा फेरबियाणी चौकात सर्व वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांसोबत यशोमती ठाकूर यांनी फुगडीचा फेर धरला. त्यानंतर ठाकूर यांनी काही अंतरापर्यंत पालखी खांद्यावर घेतली व वारकऱ्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला