अमरावती : राज्यात वनविभागात १६ वन परिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश यापूर्वी निर्गमित झाले. मात्र, हे आरएफओे पदस्थापनेच्या जागी रुजू झाले नाहीत. त्यामुळे तत्काळ बदलीच्या जागी रुजू व्हावेेत, असे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १५ मार्च रोजी जारी केले आहेत. रुजू न होणाऱ्या आरएफओ गट - ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न होणे ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे ती गैरवर्तणूक समजली जाईल, असे आदेशात नमूद आहे. १० ऑगस्ट २०२० रोजी आदेशानुसार बदलीच्या ठिकाणी रुजू होणे आवश्यक होते. मात्र, आता आरएफओंनी पदस्थापनेच्या जागी रुजू न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी सांगितले.
यात बंडू चिडे (गोंदिया), भाविक चिवंडे (नवेगाव नागिझरा), रत्नाकर निखाडे (नवेगाव नागझिरा), सिद्धेश्र्वर परिहार (प्रमुख मुख्य वनसंरक्षक कार्यालय), राजीव वैद्य (सामाजिक वनीकरण, वर्धा), रवींद्र चौधरी (ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प), उल्हास चव्हाण (भामरागड), मंगेश सातभाई (वडसा, गडचिरोली), विलास पवळे (सामाजिक वनीकरण, ईंदापूर), राघू आटोळे (सामाजिक वनीकरण, पंढरपूर) कल्याण साबळे (सामाजिक वनीकरण सातारा), भगवंत मेश्राम (वन्यजीव पांढरकवडा), पांडुरंग पाटील (पिंपळनेर, धुळे), कैलास सोनवणे (देवझिरी, यावल), ज्ञानेश्वर बेंडकुळे (जालना, धुळे), योगेश सातपुते (सिंधुदूर्ग, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.