गणेश वासनिक अमरावती :अमरावती वन विभाग (प्रादेशिक)च्या मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांच्या बंगल्यावर एक, दोन नव्हे तर तब्बल १४ वनमजूर दिमतीला असल्याची तक्रार थेट मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आली आहे. या नियमबाह्य कारनाम्याची चौकशी व्हावी, यासाठी एका विधिज्ञांच्या नावाचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र या तक्रारीशी आपला काहीही संबंध नाही. आपल्या नावाचा वापर करून कोणीतरी मुख्य सचिवांकडे तक्रार केल्याचे ‘त्या’ विधिज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही तक्रार खरी की खोटी? याचा शोध आता वन विभाग घेत आहे.
वन विभागाचा कारभार हा ब्रिटिशकालीन असाच असतो. याचा प्रत्यय अनेकदा बड्या वनाधिकाऱ्यांच्या वागणुकीतून अनुभवता येतो. मग मुख्य वनसंरक्षक असो वा क्षेत्र संचालक, वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी, सहायक वनसंरक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे वनमजूर हा त्यांचा घरगडी म्हणून दिमतीला असतो. यात प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण, कार्य आयोजना या उपविभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, सीसीएफ जयोती बॅनर्जी यांच्या बंगल्यांवर १४ वनमजूर कार्यरत असल्याची तक्रार नेमकी काेणी, का केली? याचा शोध घेतला जात आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने अमरावती वन विभागातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. अमरावती येथील ॲड. मनीष देशमुख हे तक्रारदार असून, सीसीएफ बॅनर्जी यांच्या बंगल्यावर १४ वनमजूर नियमबाह्य दिमतीला असल्याचे पत्र थेट राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती वन विभागातील ‘टॉप टू बॉटम’ अधिकारी धास्तावले आहेत. यासंदर्भात सीसीएफ जयोती बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध झाल्या नाहीत.
सहायक वनसंरक्षकांना नियमबाह्य बंगला कोणी दिला?मोर्शी येथील सहायक वनसंरक्षक डॉ. मयूर भैलुमे यांना गत काही महिन्यांपूर्वी अमरावती येथील सामाजिक वनीकरणाचे वनसंरक्षकांचा नियमबाह्य बंगला देण्यात आला आहे. एसीएफ आणि सीएफ या दोन संवर्गातील पदांमध्ये मोठी तफावत असताना वरिष्ठांनी हा निर्णय कोणाच्या आदेशाने घेतला, याचा शोध घेणे आवश्यक आहे. एसीएफ डॉ. भैलुमे यांचे मुख्यालय मोर्शी असूनही ते अमरावतीतून कारभार हाकतात, याकडे वरिष्ठ लक्ष देणार की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
"मुख्य वनसंरक्षकाच्या बंगल्यात वनमजूर असल्याबाबतच्या तक्रारीशी काहीही संबंध नाही. मला तर पहिल्यांदाच कळाले की माझ्या नावाचा वापर करून कोणीतरी मुख्य सचिवांकडे तक्रार दिली आहे."- ॲड. मनीष देशमुख, अमरावती