अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया १८ जानेवारीला पूर्ण झाली. यामध्ये मतदानाकरिता ११ हजार व मतमोजणीकरिता एक हजार असे एकूण १२ हजार कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर होते. या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १,०५० रुपयांचे मानधन त्याच दिवशी मिळायला पाहिजे. मात्र, एकाही तालुक्यात अद्याप १.१४ कोटींचे मानधन एकालाही देण्यात आलेले नसल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यापैकी १६ ग्रामपंचायती अविरोध झाल्या. त्यामुळे ५३७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान व १८ ला मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये शासकीय व निमशासकीय विभागांचे २,१७७ मतदान केंद्राध्यक्ष, ६७४५ मतदान कर्मचारी व २,०७८ शिपाई व मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रत्येक तालुक्यात ७० अशी एकूण १२ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. यामध्ये कुठेही गालबोट न लागता निवडणूक पार पडली. या दिवशी कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना मानधन देणे महत्त्वाचे आहे. मात्र, याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सोईस्कर विसर पडला. यासाठी ग्रामविकास विभागाकडून आलेला अपुरा निधी हेदेखील एक महत्त्वाचे कारण असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.
बॉक्स
पाईंटर्स
निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती : ५५३
प्रक्रियेतील अधिकारी : २५००
प्रक्रियेतील कर्मचारी : ९,५००
बॉक्स
असे मिळते मानधन
निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मान जास्त, मानधन कमी अशीच स्थिती आहे. साधारणपणे या कर्मचाऱ्यांना १,०५० रुपयांचे मानधन मतदान व मतमोजणी कर्मचाऱ्यांना देण्यात येते. याव्यतिरिक्त निवडणूक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भत्तादेखील दिला जातो. मात्र, यापैकी एकालाही मानधन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
लोकसभा, विधानसभेचे मिळाले मानधन
जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यात झालेल्या तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समिती निवडणुकीतील कर्मचाऱ्यांचे मानधन अद्यापही अप्राप्त असल्याची माहिती निवडणूक यंत्रणेतील सूत्रांनी दिली. निवडणुकीसाठी अपुरा निधी हे यामागचे कारण आहे.
बॉक्स
२.७६ कोटी हवे, मिळाले १.६१ कोटी
जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे २ कोटी ७६ लाख ५० हजार रुपयांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत १ कोटी ६१ लाख ५ हजार १०० रुपयांचा निधी जिल्हा निवडणूक विभागास प्राप्त झाला व प्रतिग्रामपंचायत २९ हजार रुपये याप्रमाणे तालुक्यांना निधीचे वाटप करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.
कोट
निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी मानधन मिळायला पाहिजे. यासाठी सर्व तालुक्यांना पत्र देण्यात येईल.
- वर्षा पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी