वाडेगाव येथे पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:19 AM2021-05-07T04:19:59+5:302021-05-07T04:19:59+5:30
पाणी पुरवठ्याच्या विहिरीत समाधानकारक पाणी असतानाही नागरिकांना काही भागात तीन आठवड्यातून एक वेळा तर काही भागात २० दिवसांनंतर पाणी ...
पाणी पुरवठ्याच्या विहिरीत समाधानकारक पाणी असतानाही नागरिकांना काही भागात तीन आठवड्यातून एक वेळा तर काही भागात २० दिवसांनंतर पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. रखरखत्या उन्हात महिला, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच काही ग्रामस्थांना सायकल, दुचाकीवर दूरवरून पाणी आणावे लागत आहेत. एकीकडे काही ग्रामस्थ पिण्याचे पाणी विकत घेत आहेत. मागील आठवड्यात ग्रामपंचायतने १५ व्या वित्त आयोगातून दोन बोअरवेल केल्या असून, यामधून ग्रामस्थांना पाणी कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाणीटंचाईची समस्या तत्काळ निकाली काढण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
फोटो:
उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायतने लक्ष द्यावे.
-विजय काळे, ग्रामस्थ वाडेगाव
मागील आठवड्यात ग्रामपंचायतने १५ व्या वित्त आयोगातून दोन बोअरवेल केल्या आहेत. लवकर प्रत्येक वाॅर्डात पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. लवकरच पाणीटंचाई दूर होईल.
- मंगेश तायडे, सरपंच वाडेगाव