अकोला : कोरडवाहू शेतीचा विकास साधायचा असेल, तर शासनाने कोरडवाहू शेतीविषयी निश्चित धोरण ठरविणे तसेच कोरडवाहू शेती विकासाबाबत कृषी विद्यापीठाने काढलेल्या निष्कर्षांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.जी. दाणी यांनी केले.विदर्भ संशोधन, तंत्रज्ञान आणि ग्रामीण कृषी विकास असोसिएशनच्यावतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात ह्यविदर्भातील कोरडवाहू क्षेत्र आणि विकास या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, ३ मार्च रोजी या परिषदेचे उद्घाटन डॉ. दाणी यांनी केले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे मृद् संधारण विभागाचे संचालक सुरेश अंबुलगेकर, कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी.जी. बथकल, संशोधन संचालक डॉ. डी. एम. मानकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. पी. जी. इंगोले, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा असोसिएशनचे संघटन सचिव डॉ. महेंद्र नागदेवे यांची उपस्थिती होती. विदर्भातील शेतकरी मोठय़ा प्रमाणात अल्पभूधारक असून, कोरडवाहू शेतीवर त्यांची गुजराण आहे. कोरडवाहू शेतीतून कमी खर्चात अधिक उत्पादन काढण्यासाठी संशोधनाची गरज आहे. याकरिता या कृषी विद्यापीठाला कोरडवाहू शेती संशोधन केंद्राची गरज असल्याचे डॉ. दाणी यांनी अधोरेखित केले. विदर्भातील खारपाणपट्टय़ावर संशोधन करावे लागणार असल्याने शासनाकडे त्यासाठी स्वतंत्र संशोधन केंद्राचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे ते म्हणाले. अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक असताना विदर्भ सिंचन सधन योजनेसाठी आपण पाठपुरावा केल्याचे अंबुलगेकर यांनी सांगितले. कोरडवाहू क्षेत्रात मृद् व जल संवर्धन ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
कोरडवाहू शेतीसाठी निश्चित धोरण असावे- आर. जी. दाणी
By admin | Updated: March 4, 2015 02:21 IST