जिल्ह्यात आता संपूर्ण ‘लाॅकडाऊन’चाच पर्याय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:20 AM2021-05-07T04:20:02+5:302021-05-07T04:20:02+5:30
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मृत्यूची संख्याही वाढत ...
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मृत्यूची संख्याही वाढत असताना, नागरिक मात्र या ना त्या कारणाने घराबाहेर पडत असून गंभीर दिसत नाहीत. त्यामुळे आता जिल्ह्यात संपूर्ण ‘लॉकडाऊन’ करण्याचाच पर्याय असून, यासंदर्भात प्रशासनाचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे संकेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी दिले.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा टास्क समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्यासह संबंधित अन्य नोडल अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, त्यामध्ये
सकाळी ८ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे. मात्र या वेळेत बाजारात आणि रस्त्यांवर नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. याशिवाय या ना त्या कारणाने नागरिक विनाकारण बाहेर पडत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या वाढत असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णांसाठी खाटा व उपचार सुविधा उपलब्ध असली तरी उपचार पुरविणाऱ्या मनुष्यबळाच्या मर्यादा आहेत. रुग्णांची हेळसांड होणार नाही यासाठी प्रशासनाचे प्राधान्य आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच संपूर्ण लॉकडाऊन या पर्यायाचा प्रशासन गांभीयाने विचार करीत आहे, असे संकेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा टास्क समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील संबंधित यंत्रणांना दिले.