मुकुंद माळवे/अकोला आयुष्याची पहाट, खेळण्याचे अल्लड वय; पण परिस्थिती गरिबीची होती. पोटाची खळगी भरण्यासाठी हाताशी येईल ते काम करण्याची तयारी होती. त्यामुळे घरच्या जनावरांसाठी चारा गोळा करण्यास गेलेला भौरद गावातील जेमतेम १३ वर्षाचा रवी तेलंग दुपार झाली तरी घरी परतलाच नाही! दुपार झाल्यानंतरही न आल्यामुळे शोधाशोध केली असता तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात येऊन जागीच गतप्राण झाला. या घटनेला दीड वर्षे झाली. तेलंग कुटुंबासाठी तर जीवितहानी कधीही न भरणारी; मात्र महावितरणकडून अद्याप विद्युत अधिनियमाप्रमाणे पूर्ण मदत दिलीच नाही. हे एक नाही अशी अनेक प्रकरणे आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अमरावती परिमंडळातील अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यात २0११-२0१४ दरम्यान तब्बल १३९ जण मृत्युमुखी पडले आहेत. यातून महावितरण कंपनीचे विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीसह, विद्युत सुरक्षा नियमांचे उघड-उघड उल्लंघन होत असल्याचा प्रकार माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीतून पुढे आला आहे. जिवंत वीज वाहिनीशी अथवा विद्युत प्रवाहाशी संपर्क आल्यास विद्युत अपघात होतात. या अपघातात प्राणहानीदेखील होत असते. पावसाळय़ात विद्युत वाहिनी तुटून वीज अपघात होण्याचे प्रकार ग्रामीण भागात होतात. महाराष्ट्र विद्युत निरीक्षण महामंडळाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २0१0-११ ते २0१२-१३ दरम्यान एकूण ६६४८ प्राणघातक विद्युत अपघात प्रकरणांची नोंद झाली आहे. या अपघातात बळी गेलेल्यांमध्ये मानवी व पशू या दोन्हींचा सामावेश आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधून सर्वात गंभीर परिस्थिती अकोला जिल्ह्याची असून, जिल्ह्यात २0११-१४ या तीन वर्षाच्या कालखंडात एकू ण १८६ विद्युत अपघात झालेत. यात ६५ व्यक्ती मुत्युमुखी पडले असून, त्यामध्ये चार विद्युत क र्मचार्यांचा समावेश आहे. यापैकी केवळ १0 प्रकरणांमध्येच महावितरणकडून मदत देण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि अचलपूर उपविभागात २0११-१३ दरम्यान झालेल्या विद्युत अपघातामध्ये ५६ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असून, त्यात तीन विद्युत कर्मचार्यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये याच कालावधीमध्ये ६१ जण मृत्युमुखी पडले असून २0 जण जखमी झाले होते. शेतकरी आजही पशुधनावर विसंबून आहे. विद्युत अपघातामध्ये पशू मोठय़ा प्रमाणात मृत्युमुखी पडतात. अकोला जिल्ह्यात उपरोक्त तीन वर्षाच्या कालावधीत ७0 जनावरे तर यवतमाळ जिल्ह्यात त्याच कालावधीत १५६ जनावरे मृत्युमुखी पडली. पशुधनाअभावी शेतकरी असाह्य होत असतो; मात्र महावितरण कंपनीद्वारे दिली जाणारी मदत अत्यंत तुटपुंजी असते. आपद्ग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे विद्युत अधिनियमात स्पष्ट निर्देश असतानाही वर्षांनुवर्षे अपघातग्रस्त कुटुंबे मदतीपासून वंचित राहतात, हे जळजळीत सत्य समोर आले असून, हा प्रकार म्हणजे महावितरणच्या दिव्याखाली अंधार अशा उक्तीत मोडणारा आहे. बहुतेक विद्युत अपघातासाठी महावितरण कंपनी पूर्णत: जबाबदार आहे. विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष, अकार्यक्षम संरक्षण योजना आणि सुरक्षा नियमांची होत असलेली पायमल्ली, यामुळे अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. विद्युत निरीक्षण मंडळ अपघाताची पाहणी करून नुकसान भरपाईसाठी अभिप्राय देते; मात्र प्रत्यक्ष नुकसान भरपाई अथवा मदत महावितरण कंपनीने द्यावयाची असल्याचे प्रादेशिक विद्युत निरीक्षक मंडळ, अमरावती अधीक्षक अभियंता दिनेश खोंडे यांनी स्पष्ट केले.
दिव्याखाली आयुष्याचा अंधार
By admin | Updated: December 15, 2014 00:11 IST