विवेक चांदूरकर / अकोला: गतवर्षी दोन्ही हंगाम हातून गेले. पेरणी तर दूरच कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठीही पैसे नाहीत. अशातच बँका कर्ज पुनर्गठन करण्यात आडकाठी आणीत असल्यामुळे शेतकर्यांपुढे पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या पीक नुकसानाचे सरळ पडसाद यावर्षी कृषी बाजारपेठेवर पडत आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांना खरीप हंगामासाठी ३४४६७ लाख रुपयांचे लक्ष्य देण्यात आले. यापैकी केवळ १२ टक्के ४४१९ लाख रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा बँकेला ८७५७८ लाख रुपयांचे लक्ष्य असून, त्यांनी ४७३२६ लाख म्हणजे ३३ टक्के कर्जाचे वाटप केले आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा झाला असून, जून महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. शेतकर्यांनी पेरणीसाठी मशागत करून जमीन सज्ज केली आहे. आता केवळ मॉन्सूनची वाट आहे. १७ ते १८ जून रोजी मॉन्सून दाखल होणार असून, शेतकरी पेरणी करणार आहेत. मात्र, शेतकर्यांकडे पेरणी करण्यासाठी, पिकांना खत देण्यासाठी पैसेच नाहीत. दुसरीकडे बँका कर्ज पुनर्गठनास टाळाटाळ करीत आहेत. शेतकरी बँकांमध्ये कर्ज घेण्यासाठी ये-जा करीत आहेत. मात्र, बँका त्यांना पुनर्गठन करण्यास नकार देत आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ १२ टक्केच कर्जवाटप केले आहे. त्यामुळे बँकांना कर्जवाटप करायचेच नाही, असे निदर्शनास येत आहे. बँकेच्या कर्जवाटपाच्या आडमुठेपणाचा सरळ परिणाम बाजारपेठेवर पडत आहे. शेतकर्यांनी बियाणे व खत खरेदी करण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे बाजारपेठेत शांतता आहे.
गत हंगामातील नुकसानाचे कृषी बाजारपेठेवर सावट
By admin | Updated: June 15, 2015 02:08 IST