तेल्हारा : येथील कृषी सेवा केंद्राचे संचालकांकडून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांसोबत कपाशी बियाणे घेण्याची सक्ती करण्यात येत असल्याची तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार कृषी विभागाच्या भरारी पथकाने ८ जून रोजी दधिमधी कृषी केंद्रावर कारवाई केली आणि पंचनामा करून अहवाल परवाना अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आला. आता या कृषी केंद्राविरुद्ध काय कारवाई होते. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकरी रुपेश लासूरकर हे महाबीजचे सोयाबीन बियाणे खरेदी करण्यासाठी दधिमधी कृषी केंद्रावर गेले असता, त्यांना कृषी केंद्र संचालकाने महाबीज बियाणांसोबतच इतर बियाणे घेण्याची सक्ती केली. शेतकऱ्याने याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार कृषी विभागाच्या भरारी पथकाने बिलांची तपासणी केली असता, सोयाबीन व कपाशीचे बिल आढळून आले. भरारी पथकाने पंचनामा करून अहवाल परवाना विभागाकडे पाठविला. तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखडे, कृषी अधिकारी नरेंद्र राठोड, मंडळ कृषी अधिकारी उमेश कदम, कृषी सहायक अविनाश मराठे, वरिष्ठ लिपिक विठ्ठल बिहाडे यांच्या पथकाने कारवाई केली. परंतु आता पंचनामा व अहवालानुसार या कृषी केंद्रावर कृषी विभागाकडून काय कारवाई येते. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांची बियाणे, कृषी केंद्रांबाबत काही तक्रार असल्यास, त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. जास्त भाव किंवा लिंकिंगमध्ये शेतकऱ्यांनी फसू नये.
- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा
माझ्या कृषी केंद्रावर झालेली कारवाई अयोग्य आहे. संबंधित शेतकऱ्याने सोयाबीनसह इतर कपाशीचे बियाणे मागितले. मागणीनुसार बियाणे उपलब्ध करून दिले.
-सुरेश दायमा, संचालक कृषी सेवा केंद्र, तेल्हारा