पिंजर : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर ते निहिदा हा सततची वर्दळ असलेला रस्ता आहे; परंतु मूर्तिजापूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावर पिंजरपासून १ किमी अंतरावर असलेल्या पुलाला अनेक दिवसांपासून मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे हा पूल कमकुवत झाला असून, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंजर ते निहिदा या रस्त्याचे अंतर अवघे पाच किमी आहे; परंतु या मार्गाला अनेक गावे जोडली आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत वर्दळ असते. गत अनेक दिवसांपासून या मार्गाची दुर्दशा झाली असून, पुलाला मोठे भगदाड पडले आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, म्हणून निहिदा येथील सरपंच विजय ठाकरे, नंदकिशोर गिलबिले आदींनी मूर्तिजापूर सा.बां. उपविभागाकडे अनेकदा विनंती अर्ज केले; परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. या मार्गावरून उमदरी, बहिरखेड, लखमापूर, निहिदा, पिर्हांडे, जमकेश्वर, सावरखेड, धाकली आदी गावांच्या लोकांना जीव धोक्यात टाकून वाहने न्यावी लागतात. त्यामुळे या मार्गाची व पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्या किरण सतीश गावंडे व ग्रामस्थांनी केली आहे.
पुलाला पडले भगदाड
By admin | Updated: May 11, 2014 00:19 IST