अकोला : दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांचे कर्ज सरसकट माफ करून, दुबार पेरणीसाठी शंभर टक्के अनुदान देण्याच्या मागणीकरिता भारिप-बहुजन महासंघ जिल्हा शाखेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी, जोरदार पाऊस झाला नसल्याने, शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांकडील कर्ज शासनाकडून सरसकट माफ करण्यात यावे, तसेच दुबार पेरणीसाठी शेतकर्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, रोजगार हमी योजनेंतर्गत तातडीने कामे सुरू करून, बेरोजगार व मजुरांना कामे उपलब्ध करुन द्यावी,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंंना मोफत प्रवास पास उपलब्ध करुन देण्यात यावा,नगरपालिका, महानगरपालिका हद्दीतील रमाई आवास घरकूल योजनांची तातडीने अंमलबजाणी करुन घरकुलांचा प्रश्न मार्गी लावावा, विविध योजनांतर्गत प्राप्त निधीचे लाभार्थींंंना वितरण करण्यात यावे आणि सामाजिक न्याय भवनाचा रखडलेला प्रश्न तातडीने मार्गी लावावा इत्यादी मागण्यांसाठी भारिप-बमसं जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील टॉवरचौकस्थित भारिप-बमसंच्या जिल्हा कार्यालयासमोरून काढण्यात आलेला मोर्चा बसस्थानक समोरून गांधी रोड, तहसील कार्यालय मार्गे मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. यावेळी पक्षाच्या नेत्यांनी मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर एका शिष्टमंडळामार्फत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांना सादर करण्यात आले.
शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी भारिपचा धडक मोर्चा
By admin | Updated: July 14, 2015 02:15 IST