नगरची सचोटी झुंबरलाल सारडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 03:23 PM2019-08-18T15:23:32+5:302019-08-18T15:24:02+5:30

आयुष्यभर काँग्रेसी विचारांचे पाईक असणारे कै. झुंबरलाल सारडा हे हिंदू विचारांचेही पाठीराखे होते, असे ब्रिजलाल सारडा यांनी आठवणी सांगताना उल्लेख केला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हे वैचारिक मिश्रण अनोखे होते. स्वच्छ चारित्र्य आणि सच्चा माणूस, गोरगरिबांचा सदैव आधार असलेले प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती़ तत्कालीन नगरपालिकेत अहमदनगर शहराचे नगराध्यक्ष असताना नगरच्या पाणी योजनेची मुहूर्तमेढ रोवणारे सारडा यांनी पाणी योजनेला गती दिली. नगरला पाणी पुरवठा करण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीमुळेच पुढे ही योजना प्रत्यक्षात साकारली. 

Zumbarlal Sarada holds the integrity of the city | नगरची सचोटी झुंबरलाल सारडा

नगरची सचोटी झुंबरलाल सारडा

googlenewsNext

अहमदनगर : झुंबरलाल सीताराम सारडा यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण नगरच्या सोसायटी हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. त्यानंतर ते मुंबईला शिकण्यासाठी गेले. मात्र त्यांचे तेथे मन रमले नाही. एक वर्षभर कॉलेज करून ते पुन्हा नगरला परतले. त्यावेळी सारडा यांच्या घरातच कापडाचा व्यवसाय सुरू होता. कापड तयार करणे, ते विकणे याची सारडा यांना मनापासून आवड लागली. मुंबई, सोलापूर, इचलकरंजी येथील वस्त्र तयार करणाºया मिलशी त्यांनी संबंध प्रस्थापित केले. त्यांच्याकडून बरेच काही शिकले. प्रसिद्ध उद्योजक मफतलाल अरविंदभाई यांच्याशी त्यांचे संबंध आले.  त्यानंतर नगरला सावेडीत (सध्याच्या बिग बाजारची जागा) सारडा मिल सुरू झाली. याशिवाय कोठी परिसरात जिनिंग-प्रेसिंग, आॅईल मिल असे इतरही उद्योग त्यांनी सुरू करून स्थानिकांना रोजगार दिला. देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी साबणाचा कारखानाही काढला. नोकºयांपेक्षा उद्योग, व्यवसाय सुरू करा, असाच त्यांचा तरुणांना आग्रह असायचा. गरज पडली तर उद्योगशील तरुणांना ते आर्थिक मदत करायलाही मागे-पुढे पाहत नसत. त्यांच्या या स्वभावामुळेच अनेक उद्योजक, व्यापारी नगरमध्ये घडले. परदेशी शिक्षणासाठीही त्यांनी अनेक तरुणांना आर्थिक मदत केली.
सारडा यांच्या व्यक्तिमत्त्वात एक सामाजिक सेवा करण्याचा गुणही ओतप्रोत भरलेला होता. एक उद्योजक म्हणून काम करताना समाजातील वंचित घटकाकडेही त्यांचे विशेष लक्ष होते. हिंद सेवा मंडळात ते १९४० च्या आसपास सक्रिय झाले. विद्यार्थी सेवा मंडळाचे रामकरण सारडा वसतिगृह सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. स्वातंत्र्यपूर्व काळात ते भाई सथ्था यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत राहिले. महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्या जीवनावर पगडा होता. त्यामुळेच गोर-गरिबांना मदत करण्यासाठी ते सदैव पुढेच असायचे. १९७२ मध्ये दुष्काळ पडला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या जिनिंग- प्रेसिंगच्या आवारातच सुकडी प्रकल्प चालविला. त्यासाठी त्यांनी सरकारचे अनुदान घेतले नाही की कोणाकडून पैसेही घेतले नाहीत़ राज्यभर जाणारी सुकडी तेव्हा नगरमधूनच जात होती. या सुकडी प्रकल्पाची गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. 
१९५२ मध्ये कै. झुंबरलाल यांचे बंधू बन्सीलाल सारडा हे राजकारणात आले. त्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढविली आणि ते नगरसेवकही झाले. बंधूमुळे त्यांनाही राजकारणाची आवड लागली. राजकारणात उडी घेत नगरपालिकेची निवडणूक लढविली आणि नगरसेवकही झाले. १९५७ पासून ते १९७२ पर्यंत ते नगरपालिकेत सातत्याने निवडून आले आणि नगरसेवक झाले. १९६७ मध्ये ते शहराचे नगराध्यक्ष झाले. अर्थकारणाशी त्यांचे जवळचे नाते होते. याच माध्यमातून नगर अर्बन बँकेचे ते संचालक आणि अध्यक्षही राहिले. मोतीलाल फिरोदिया यांनी स्थापन केलेल्या इंडस्ट्रीयल इस्टेट या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. नगरमध्ये एमआयडीसी येण्याच्या आधी ही संघटना नगरला उदयाला आली, यामध्येच त्यांची दूरदृष्टी दिसून येते. 
नगरच्या वस्तू संग्रहालयाचीही त्यांनी उभारणी केली. आडते बाजाराच्या उभारणीत त्यांचा मोठा सहभाग राहिला. कुष्ठधाम परिसरात वृद्धाश्रम सुरू केला. नगराध्यक्ष असताना त्यांनी शहरात अनेक विकास कामे केली. काँग्रेसची परंपरा जुनी आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे १९४० पासून ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते. पक्षाचे त्यांनी निष्ठेने काम केले. सरळ, साधा स्वभाव असलेल्या सारडा यांनी नगराध्यक्ष असताना किंवा राजकीय पदे भोगताना कोणत्याही यंत्रणेचा कधी वापर केला नाही. हिंद सेवा मंडळाचा विस्तार करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. ताकिया ट्रस्टची जागा त्यांनी संस्थेसाठी घेतली आणि संस्थेचा विस्तार करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. आणीबाणीच्या काळात सरकारी अधिकारी व्यापाºयांना आयकर भरण्याबाबत खूप त्रास द्यायचे. सरकारी अधिकाºयांविरुद्ध त्यांनी व्यापाºयांमध्ये असंतोष निर्माण केला. यासंदर्भात त्यांनी तत्कालीन मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्याकडे तक्रार केली. तपासणीच्या नावाखाली अधिकारी व्यापाºयांना त्रास द्यायचे. खताळ पाटील यांनी लक्ष घातल्याने व्यापाºयांचा त्रास कमी झाला.  
सारडा यांचे जीवन स्वच्छ होते. भ्रष्टाचार, गुन्हेगारीच्या यादीत त्यांचे नाव कधीही आले नाही. महात्मा गांधी यांच्या विचारांप्रमाणे ते वागायचे. विश्वस्ताच्या भूमिकेमधूनच त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक संस्थांवर काम केले़ त्या वाढविल्या. हस्तीमल फिरोदिया, नवनीतभाई बार्शीकर यांच्यासोबतच त्यांनी शालेय शिक्षण घेतले. कै. बाळासाहेब भारदे यांचा मोठा सहवास लाभला. म्हणून भारदे यांच्या जीवनाचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. समाजजीवनात स्वच्छ राहण्याचे ते त्यांच्याकडूनच शिकले. एक समर्पित जीवन म्हणून सारडा यांच्या जीवनाकडे पाहता येईल. राजकारणात विधानपरिषदेची निवडणूक त्यांनी लढविली. आबासाहेब निंबाळकर यांच्याकडून ते १३ मतांनी पराभूत झाले. नगर जिल्ह्यातील पुढारी, तत्कालीन केंद्रीय मंत्री यांच्यासोबत त्यांचे सलोख्याचे व घनिष्ठ संबंध होते. सारडा महाविद्यालय, सारडा हायस्कूल उभारण्यासाठी त्यांचाच पुढाकार होता. सारडा महाविद्यालयातील एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही त्यांनी बोलविले होते. सारडा यांच्या आग्रहावरून ते नगरमध्ये आले.


आणि तिकीट हुकले
भाजपचे माजी पंतप्रधान व ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्यामुळे काँग्रेस नेते झुंबरलाल सारडा यांचे तिकीट कापले गेले. आता या गोष्टींवर विश्वास बसणार नाही, मात्र त्यावेळची ही सत्य घटना होती. अटलबिहारी वाजपेयी यांचा १९६८ मध्ये नगरला नागरी सत्कार झाला. त्यावेळी नगराध्यक्ष असलेले झुंबरलाल सारडा यांना १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट कापले. १९६८ मध्ये सारडा नगराध्यक्ष होते. नगराध्यक्ष या नात्याने सारडा यांनी वाजपेयी यांचा सत्कार केला. तसेच नगरपालिकेतर्फे मानपत्रही दिले. या सत्काराचा त्यांना चार वर्षानंतर फटका बसला. सारडा यांनाच १९७२ च्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून स्थानिक नेत्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याकडे आग्रह केला होता. पण जनसंघाच्या वाजपेयी यांचा सत्कार केल्याने त्यांना तिकीट न देण्याचा निर्णय काँग्रेस समितीने घेतला होता. 

नाईकांच्या हस्ते पाणी योजनेचे भूमिपूजन
 झुंबरलाल सारडा यांना बजरंगलाल, कै. बाळकिसन, ब्रिजलाल, मधुसूदन आणि लक्ष्मीनारायण ही मुले. सारडा म्हणजे सचोटीचा व्यवहार अशी एक ओळख बनली होती. कधीही त्यांनी फसवेगिरी केली नाही आणि तीच शिकवण मुलांना दिली. समाजकारण करताना त्यांनी कधी पंक्तीभेद केला नाही. ते एक खºया अर्थाने समाजाचे रिफॉर्मर होते़
राहुरीजवळील मुळा धरणातून नगर शहराला ४७० दशलक्ष घनफूट पाण्याची तरतूद असलेली पाणी पुरवठा योजना १९७२ मध्ये प्रत्यक्षात आली. मात्र त्याआधी चार वर्षापूर्वीच नगराध्यक्ष झुंबरलाल सारडा व आमदार डॉ. श्रीकृष्ण निसळ यांच्या पुढाकाराने पाणी योजनेचे भूमिपूजन झाले होते. ज्यावेळी पाणी योजना निश्चित झाली त्यावेळी सारडा यांनी योजनेच्या खर्चासाठी दोन कोटी रुपये देण्याची तयारी दाखविली होती. मात्र त्या बदल्यात सध्याच्या सावेडी परिसराला ‘सारडा नगर’ हे नाव देण्याची त्यांची अपेक्षा होती. मात्र शासनाने त्यांचे पैसेही घेतले नाही आणि नावही दिले नाही. १९ फेब्रुवारी १९६८ रोजी सध्याच्या वसंत टेकडी परिसरातील भूमिगत पाणी टाकीच्या भूमिपूजनापासून नगरच्या पाणी योजनेच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमाला तत्कालीन नगरविकास खात्याचे मंत्री पु. ग.खेर, मंत्री आबासाहेब निंबाळकर उपस्थित होते. या भूमिपूजनाची कोनशिलाही तेथे बसविण्यात आलेली आहे. या योजनेचे भूमिपूजन झाल्यानंतर नवनीतभाई बार्शीकर यांच्या काळात ही योजना प्रत्यक्षात आली.

शब्दाकंन : सुदाम देशमुख  (या लेखातील महत्त्वाचे संदर्भ, आठवणी  त्यांचे पुत्र व ज्येष्ठ नेते ब्रिजलाल सारडा यांनी     सांगितल्या आहेत. )

Web Title: Zumbarlal Sarada holds the integrity of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.