अहमदनगर : येथील एका खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात ऑक्सिजनची तीव्र टंचाई आहे. जिल्ह्यासाठी रोज 60 मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. त्यात सोमवारी 20 तर मंगळवारी 50 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने तो ऑक्सिजन अपुरा पडत आहे.
उपलब्ध झालेला 50 टन ऑक्सिजन जिल्हा रुग्णालय व शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयात पाठवला जातो. याबाबत समप्रमाणात व न्याय्य पद्धतीने वाटप होत नसल्याने अनेक रुग्णालयाना ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने तेथील रुग्णांचा जीव ऑक्सिजन अभावी गुदमरला आहे. याकडे लक्ष द्यायला प्रशासनाकडे वेळ नसल्याचे दिसून येत आहे. तसेच सर्व खासगी रुग्णालयाना ऑक्सिजन मिळावा यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर कोणतेही नियोजन होत नसल्याचे दिसते आहे. यामुळे ऑक्सिजन सिलेंडर आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले जाते. तेही खासगी रिफीलर प्लान्टवर जातात. मात्र तिथेही मोठ्या रांगा लागल्याने दहा ते बारा तासांनी ऑक्सिजन मिळतो. हीच परिस्थिती एका खासगी रुग्णालयातील रुग्णांवर बेतली व त्यातच त्यांचे मृत्यू झाल्याची माहिती आहे.
आता उपलब्ध झालेला ऑक्सिजन सर्व रुग्णालयाना मिळेल याबाबत जिल्हा प्रशासन नियोजन करणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.