बाजारपेठा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:21 AM2021-04-08T04:21:49+5:302021-04-08T04:21:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील व्यापारी बाजारपेठा बंद झाल्याने व्यापाऱ्यांसह कामगारांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमधून टाळेबंदीला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहरातील व्यापारी बाजारपेठा बंद झाल्याने व्यापाऱ्यांसह कामगारांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमधून टाळेबंदीला विरोध होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी याेग्य उपाययोजना करून बाजारपेठा सुरू करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे बुधवारी निवेदनाव्दारे केली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की टाळेबंदीच्या नियमावलीमुळे नगर शहरातील बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे व्यापारी व सामान्य नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. सरकारचा हेतू चुकीचा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊनच सरकारने हा निर्णय घेतला आहे. मागील लॉकडाऊनच्या काळात कोरोना हा अजार पूर्णपणे नवीन होता. या रोगाशी कसे लढायचे, याबाबत शाश्वत उपाययोजना नव्हत्या; परंतु सद्य:स्थितीत सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे आरोग्य सुविधा निर्माण झालेल्या आहेत. तसेच नागरिकांमध्येही जनजागृती होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना कराव्यात. टाळेबंदी शिथिल करून बाजारपेठा सुरू करण्याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात यावेत, जेणेकरून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी कामगारांची आर्थिक कोंडी होणार नाही. ही आर्थिक कोंडी सरकार व सामान्यांना परवडणारी नसल्याने टाळेबंदी शिथिल करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.