वटपौर्णिमेपासून जिल्ह्यात एक व्यक्ती एक झाड अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:15 AM2021-06-19T04:15:39+5:302021-06-19T04:15:39+5:30
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि सक्रिय सहभागाबरोबरच स्वयंसेवी संस्था, ...
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि सक्रिय सहभागाबरोबरच स्वयंसेवी संस्था, विविध पदाधिकारी यांच्यासह लोकसहभाग यामध्ये घेतला जाणार आहे. नगर परिषद, नगरपंचायत हद्दीत लोकसहभागातून सहा लाख ७० हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. येत्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या रोप लागवडीने या अभियानाची सुरुवात होईल.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शुक्रवारी यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश दिले. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील नगर परिषद, पंचायत क्षेत्रात प्रशासकीय यंत्रणा व लोकसहभागातून 'एक व्यक्ती-एक झाड' अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी नगर परिषद, नगरपंचायतीनिहाय वृक्ष लागवडीचे उद्दिष्टदेखील निश्चित केले आहे. श्रीरामपूर नगर परिषद ९० हजार, संगमनेर ९० हजार, कोपरगाव ९० हजार, राहुरी ५० हजार, देवळाली प्रवरा ४० हजार, राहाता ३० हजार, पाथर्डी ३० हजार, श्रीगोंदा ३५ हजार, शेवगाव ४० हजार, जामखेड ४० हजार, शिर्डी नगरपंचायत ४० हजार, अकोले २० हजार, कर्जत ३० हजार, पारनेर २० हजार आणि नेवासा २५ हजार असे एकूण ६ लाख ७० हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले आहे. सर्वांनी हे अभियान यशस्वी करून पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.