निष्काळजीपणामुळे गावाला कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:19 AM2021-04-13T04:19:04+5:302021-04-13T04:19:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : कोरोनाच्या उपचारामध्ये दाखविलेला निष्काळजीपणा संपूर्ण गावाच्याच अंगलट आल्याचा प्रकार तालुक्यातील कान्हेगाव येथे घडला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : कोरोनाच्या उपचारामध्ये दाखविलेला निष्काळजीपणा संपूर्ण गावाच्याच अंगलट आल्याचा प्रकार तालुक्यातील कान्हेगाव येथे घडला आहे. एक हजारपेक्षा कमी लोकवस्तीच्या गावात गेल्या काही दिवसांत ६८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिबिर घेऊन दररोज शंभरावर चाचण्या कराव्या लागत आहेत.
प्रवरा नदीच्या काठावर वसलेले कान्हेगाव हे घनदाट लोकवस्तीचे गाव आहे. अवघे दोनशेच्यावर कुटुंब येथे राहतात. श्रीरामपूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील या गावाला कोरोनाचा अक्षरश: विळखा पडला आहे.
सर्दी, खोकल्याची लक्षणे असलेल्या काही संशयितांनी निष्काळजीपणा केला. रुग्णालयात उपचार घेतले नाही. त्याचा सर्वांनाच फटका बसला. रुग्णसंख्येने शतक गाठण्याची येथे भीती व्यक्त होत आहे. गावात रविवारी एकाच दिवशी कोरोनाचे २३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने कान्हेगावचा इतर गावांशी संपर्क तोडला आहे. गावांत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. संपूर्ण गावात सध्या शुकशुकाट आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. जोशी यांनी दररोज शंभर अँटिजेन चाचण्या केल्या जात असल्याचे सांगितले. ३००हून अधिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. मालुंजे व पढेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी गावावर लक्ष ठेवून आहेत. संशयिताना श्रीरामपूर येथील कोरोना उपचार केंद्रावर पाठविले जात आहे. सौम्य लक्षणाच्या कोणत्याही रुग्णाला घरी ठेवले जात नाही. रुग्णांवर ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर, तसेच नगर येथील सिव्हिल रुग्णालय व इतर खासगी ठिकाणी उपचार सुरू आहेत, असे त्या म्हणाल्या.
---------
चाचण्यांची भीती बाळगू नका
सर्दी-खोकला व ताप अंगावर जास्त दिवस काढू नये. संशय आल्यास तातडीने कोरोनाची चाचणी करून घ्यावी. त्यामुळे कुटुंब व गाव सुरक्षित राहील, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. जोशी यांनी केले आहे.
-----------