केवळ सूचनांचे इंजेक्शन अन् आश्वासनांची मलमपट्टी नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:19 AM2021-04-18T04:19:38+5:302021-04-18T04:19:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिर्डी : पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोना संदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शिर्डी दौऱ्यावर आले होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोना संदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शिर्डी दौऱ्यावर आले होते. कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असताना पालकमंत्र्यांनी सूचनांचे इंजेक्शन व आश्वासनांची मलमपट्टी करण्यापेक्षा शंभर वर्षांचा रुग्णसेवेचा वारसा असलेल्या साई संस्थानवर तातडीने विश्वस्त मंडळाची नियुक्ती करून संस्थानला मैदानात उतरवणे अत्यावश्यक झाले आहे.
रूग्णसेवा व मानवता हीच खरी साईबाबांची ओळख आहे. भाविकांच्या श्रद्धेतून श्रीमंत झालेल्या या संस्थानला आता लोकांचे जीव वाचविण्यासाठी चौकटीच्या बाहेर जावून काम करण्याची गरज आहे. उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली तदर्थ समिती सध्या संस्थानचा कारभार पाहात आहे. समिती व प्रशासनात एकवाक्यता नसल्याचे व विरूद्ध दिशेला तोंडे असल्याचे सर्वश्रुत आहे. यामुळे संस्थानची अवस्था सध्या ‘चलती का नाम गाडी’ अशीच आहे.
मुबलक पैसा असतानाही निर्णय व खरेदी प्रक्रिया रेंगाळत असल्याने संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये देणगीदारांपुढे हात पसरावे लागत आहेत. डॉक्टर्स, परिचारिकांबरोबरच औषधांचा तुटवडा आहे. या परिस्थितीतही संस्थान उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारे शक्य तेवढी लढाई लढत आहे.
कोरोनाविरूद्धच्या लढाईला या परिसरात गती व व्यापकता देण्यासाठी पालकमंत्र्यांनी मंत्रिमंडळात आपले वजन वापरून संस्थानवर तत्काळ विश्वस्त मंडळ नियुक्त करणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करूनही शासन विश्वस्त मंडळाची अद्याप नियुक्ती करू शकले नाही.
विश्वस्त मंडळ कायदे दुर्लक्षित करून आर्थिक निर्णय घेऊ शकणार नसले तरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भाविकांना मदतीसाठी साद घालू शकते. यामुळे देश-विदेशातून साईबाबांच्या रूग्णसेवेच्या यज्ञात समीधा टाकण्यासाठी हजारो हात पुढे येतील.
केवळ रेमडेसिविर, ऑक्सिजनच्या उपलब्धतेने रूग्णसेवेतील समस्या कमी होतील किंवा पूर्ण सुटतील, अशी शक्यता नाही.
संस्थान रूग्णालयाला औषधांबरोबरच शिकाऊ डॉक्टर्स, परिचारिका उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. केवळ सूचनांच्या माऱ्याने सध्याची यंत्रणाही कोलमडण्याची भीती आहे.
...........
साई संस्थांनवर तातडीने विश्वस्त मंडळ नियुक्त करणे आवश्यक आहे.
सुपरस्पेशालिटी रूग्णालय कोविडमध्ये रूपांतरित करताना हृदय, मेंदू, डायलिसीससारख्या नॉनकोविड सेवाही दुर्लक्षित होऊ नयेत. प्रत्येक तालुक्याने आपापल्या तालुक्यात कोविड उपचारांची व्यवस्था निर्माण करावी.
- रमेशराव गोंदकर, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी