मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. महाराष्ट्र शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर काही गावातील शेतकऱ्यांना मिळाले होते तर काहींना मिळाले नव्हते. पाथर्डी तालुक्यातील अनेक गावामधील शेतकरी या भरपाईपासून वंचित होते. अनेकवेळा पाठपुरावा करुन देखील या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने पाथर्डी तहसीलदार यांना निवेदन देऊन चिचोंडी येथे रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेऊन तहसीलदारांनी पाठपुरावा करून कोल्हार येथील २३८ शेतकऱ्यांचे ११ लाख ८४ हजार ८०० रुपये, शिराळ येथील ७४२ शेतकऱ्यांसाठी २६ लाख ७५ हजार ३०० तर शिंगवे केशव येथील ३६८ शेतकऱ्यांचे २९ लाख २२ हजार ४९९ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. गावातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा झाल्याने संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पालवे, निवृती भाबड, भाऊसाहेब करपे, जगन्नाथ जावळे, मेजर शिवाजी गर्जे, संभाजी वांढेकर, दिगंबर शेळके, संतोष मगर, मदन पालवे, अॅड. पोपट पालवे, अॅड. संदीप जावळे, सरपंच शिवाजी पालवे, आजिनाथ पालवे, माजी सरपंच बाबाजी पालवे, महादेव गर्जे यांनी परिश्रम घेतले.
शेतकऱ्यांना मिळाली नुकसानभरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:25 AM