अहमदनगर, दि. ३० - पोलिसांनी जवखेडा हत्याकांडाचा तपास वेळेत पूर्ण केला नाही तर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवू असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलिसांना दिला आहे. याप्रकरणी कोणतीही चुकीची कारवाई होऊ देणार नाही असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी पिडीत कुटुंबियांना दिले आहे.
जवखेडा येथील जाधव कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाला ४० दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप मारेक-यांना अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी चार जणांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली असली तरी या चौघांनी कोर्टात धाव घेत नार्को टेस्टला विरोध केला आहे. कोर्टानेही या चौघांची नार्को टेस्ट करण्याची परवानगी नाकारली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी जाधव कुटुंबियांची भेट घेतली. मारेक-यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पिडीत कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. दोषींवर कायदेशीर कारवाई होईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांना दिले आहे.