अहमदनगर जिल्ह्याचा कृषी जीडीपी राज्यात नंबर वन असेल : पालकमंत्री हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 08:37 PM2021-05-13T20:37:58+5:302021-05-13T20:38:50+5:30

लक्षांकानुसार राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा. कोणत्याही परिस्थितीत बियाणे व खतांसाठी शेतकऱ्यांची अडचण होणार नाही, याची काळजी घेऊ, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

The agricultural GDP of Ahmednagar district will be number one in the state | अहमदनगर जिल्ह्याचा कृषी जीडीपी राज्यात नंबर वन असेल : पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर जिल्ह्याचा कृषी जीडीपी राज्यात नंबर वन असेल : पालकमंत्री हसन मुश्रीफ

Next

अहमदनगर : लक्षांकानुसार राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा. कोणत्याही परिस्थितीत बियाणे व खतांसाठी शेतकऱ्यांची अडचण होणार नाही, याची काळजी घेऊ, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. अहमदनगर जिल्ह्याचा कृषीचा जीडीपी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नंबर वन असेल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी खरीप हंगाम-२०२१ च्या अनुषंगाने प्रशासनाने पेरणीपूर्व केलेल्या नियोजनाचा व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजे भोसले, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहीत पवार, आमदार किरण लहामटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती काशीनाथ दाते, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, कृषी उपसंचालक विलास नलगे, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक संदीप वालावलकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, जिल्हा कृषी अधिकारी सुनील राठी, आत्मा प्रकल्प उपसंचालक अनिल गवळी आदी यामध्ये सहभागी झाले होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की, शेतकऱ्यांना खते- बियाणांची अडचण येता कामा नये. खरीप हंगामात खते- बियाणांचा पुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घ्यावी. अडचणीची संभाव्य शक्यता गृहीत धरून जिल्हास्तरासाठी ८ हजार टन युरियाचा बफर स्टॉक करावा. पावसाळी दिवसात आदिवासी परिसरात निर्माण होणारी अडचण लक्षात घेऊन नियोजन करावे. खरीप हंगामासाठी सहकारी- राष्ट्रीयीकृत बँकांनी लक्षांकाप्रमाणे शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रशासनास दिले. कुकडी प्रकल्पातील जिल्ह्याच्या हक्काचे पाणी जिल्ह्यास मिळेल, त्यासाठी निश्चित पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील खरीप हंगामाखालील सरासरी क्षेत्र ४ लाख ४८ हजार हेक्टर आहे; मात्र यावर्षी हवामान विभागाने व्यक्त केलेल्या संकेतानुसार पाऊस चांगला व वेळेवर झाला, तर जिल्ह्यात मागील वर्षीप्रमाणे जवळपास खरिपाची १४८ टक्के पेरणी होणे अपेक्षित आहे. कृषी विभागाने ६ लाख ८५ हजार हेक्‍टरवर खरीप पेरणी होण्याची शक्यता गृहीत धरून नियोजन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी भोसले यांनी दिली. बैठकीला ऑनलाइन उपस्थित असणाऱ्या आमदारांनीही विविध सूचना मांडल्या.

अशी असेल पीकनिहाय लागवड

जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ३३ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड अपेक्षित आहे, तसेच बाजरी १ लाख ५५ हजार हेक्टर, सोयाबीन ९५ हजार हेक्टर, उडीद ५२ हजार १७८ हेक्टर, तूर ६५ हजार हेक्टर, मूग ५४ हजार ३६६ हेक्टर, मका ७४ हजार ५३४ हेक्टर, भात १९ हजार हेक्टर, भुईमूग ९ हजार ६०० हेक्टर अशी खरीप हंगामातील पिकांची पेरणी होणे अपेक्षित आहे. खरीप हंगामासाठी युरिया, डीएपी, एसएसपी, संयुक्त आदी खतांची जिल्ह्यासाठी खरीप हंगामाकरिता कृषी विभागाने २ लाख ५५ हजार मेट्रिक टन खतांची मागणी नोंदवली आहे. त्यापैकी २ लाख १२ हजार १५० मेट्रिक टनाचे जिल्ह्यासाठी आवंटन असून, आजमितीस १ लाख २८ हजार मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे, तसेच खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले ६ हजार ४२० क्विंटल बियाणांची प्लेसमेंट झाली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: The agricultural GDP of Ahmednagar district will be number one in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.