-------------------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा बंद असून, तालुक्यातून गावांत अजूनही बस सुरू झालेली नाही. गावात बस येत नसल्याने ग्रामस्थांना शहरात येण्यासाठी खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बससेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य परिवहन मंडळाने आंतरजिल्हा, परराज्यातील लांब आणि मध्यम पल्ल्याच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नगर शहरातून तालुक्याला बस धावू लागली आहे. परंतु, तालुक्यातून गावाकडे जाणाऱ्या बस बंद आहेत. दुसरी लाट ओसरल्यानंतर मध्यंतरी ग्रामीण भागातील बस सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. एसटीला प्रति किलोमीटरसाठी सुमारे २२ रुपये खर्च येतो. तुलनेत प्रवासी मिळत नाहीत. त्यात शाळा, महाविद्यालयेही बंद आहेत. त्यामुळे प्रवासी मिळत नसल्याने गावातील बससेवा बंद आहे. तालुका मुख्यालयातून अनेक गावांत मुक्कामी बस जात होत्या. परंतु, त्यात आता बंद करण्यात आलेल्या आहेत. तोट्यातील फेऱ्या महामंडळाने बंद केल्या असून, शाळा महाविद्यालये सुरू झाल्यानंतर गावातील एसटीही सुरू केली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
....
जिल्ह्यातील एकूण आगार
११
....
एकूण बसेस
५६५
...
एकूण फेऱ्या
९००
......
बंद असलेल्या फेऱ्या
९००
......
खेडेगावात जाण्यासाठी टमटमचा आधार
ग्रामीण भागातील बसच्या फेऱ्या बंद आहेत. बस बंद असल्याने प्रवासासाठी ग्रामस्थ खासगी वाहनांचा वापर करीत आहेत. बस नसल्याने खासगी वाहन चालकांची मनमानी सुरू असून, वारेमापपणे भाडेवाढ करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक सध्या ग्रामीण भागात सुरू असल्याचे पहायला मिळते.
......
- कोरोनाआधी गाव तिथे बस सुरू होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी बससेवा बंद करण्यात आली. दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक गावांत फेऱ्या सुरू करण्यात आल्या. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. शाळा बंद असल्याने प्रवाशी मिळत नसल्याने गावातील बस बंद आहेत.
- विजय गिते, विभाग नियंत्रक
...