अहमदनगर : वीज कडाडताच मोबाईल बंद ठेवावेत, झाडांपासून, दारे-खिडक्यांपासून दूर राहावे, टी. व्ही. बंद करावा, त्याचा प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवावा. संगणक, फ्रिजही बंद ठेवावा, मोकळ्या मैदानात थांबू नये, अशी खबरदारी पावसाळ्यात घ्यावी. त्यामुळे वीज पडून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण घटू शकते. जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षांत ४१ जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
गेल्या वर्षीही जिल्हाभर दमदार पाऊस झाला. यंदाही हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसा हंगामाच्या सुरुवातीलाच दमदार पाऊसही सुरू झाला. पावसाळ्यात वीज पडून मनुष्यहानीसह जनावरांच्या मृत्युचेही प्रमाण मोठे आहे. त्यामुळे विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर खबरदारी घेणे गरजेचे असते. मात्र, याबाबत नागरिकांमध्ये उदासीनता दिसते. त्यामुळे वीज पडून मनुष्यहानी होण्याचे प्रमाणही मोठे आहे. जिल्ह्यात २०१६/१७ मध्ये १३, तर २०१७/१८ मध्ये १२ असे बळी गेले आहेत. २०१८/१९ मध्ये ६, २०१९/२०२० मध्ये ५ जणांचा मृत्यू वीज पडून झाला.
---
जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा किती?
जिल्ह्यात संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव आदी तालुक्यांमध्ये काही ठिकाणी शासकीय वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र, ती यंत्रणा सुरू आहे की बंद याबाबत प्रशासनाकडेच माहिती उपलब्ध नाही. नव्या शासकीय इमारती, मोठमोठ्या खासगी इमारती, विद्युत विभागाचे मोठे टॉवर, मोबाईल टॉवर आदींवर वीज अटकाव यंत्रणा बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणांवर असलेल्या वीज अटकाव यंत्रणांच्या भरवशावरच सध्या जिल्ह्यात वीज अटकाव करण्याचे काम सुरू आहे.
-----
वीज पडल्याने झालेले मृत्यू
वर्ष मृत्यू संख्या
२०१६/१७ १३
२०१७/१८ १२
२०१८/१९ ६
२०१९/२० ५
२०२१ जुलैपर्यंत ५
-------
वीज कडाडत असताना ही घ्या काळजी...
वीज कडाडत असताना तत्काळ सुरक्षितस्थळी जावे. घरात किंवा एखाद्या इमारतीत ताबडतोब शिरा. दारे, खिडक्यांपासून दूर रहा. विजेपासून वाहणारा प्रवाह (करंट) तारा, केबल, पाईपमधून वाहून तुमच्या शरीराला इजा, नुकसान पोहोचवू शकतो. पाण्यात उभे असाल तर बाजूला व्हा, उंचावर असाल तर सुरक्षित जा. झाडाखाली, मोकळ्या मैदानात उभे राहू नका. स्वत:चा विजेपासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडायच्या आधी हवामानाचा अंदाज घ्या. टी. व्ही., संगणक, फ्रीज बंद ठेवा. त्याचा प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवा. मोबाईल फोन (भ्रमणध्वनी) बंद ठेवा. लँडलाईन बंद ठेवा. त्याचा प्लग काढून ठेवा. मोबाईल चार्जिंगला लावला असेल तर चार्जिंग बंद करून ठेवा. चार्जरची वायर प्लगमधून बाजूला काढून ठेवा. एखाद्या वाहनात असेल तर त्यातच बसून राहा. छत नसलेल्या वाहनात बसणे टाळावे, असे आवाहन शेवगावचे सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार यांनी केले.