अहमदनगर : महावितरण कंपनी सरकारी असून, त्यांच्याकडे कामाचा व्याप मोठा आहे़ ग्रामीण भागात वीज वितरणाची अवस्था बिकट आहे़ मुंबई येथे मात्र, टाटा, रिलायन्स या खासगी कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना वीज पुरवठा केला जाते़ महावितरणपेक्षा त्यांची सेवा चांगली असून, तेथील ग्राहकांच्या तक्रारीही नगण्य असल्याचे विद्युत लोकपाल आऱ डी़ संखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़ वीज ग्राहकांसाठी ‘न्याय आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत संखे यांनी शुक्रवारी येथील महावितरणच्या कार्यालयात भेट देऊन ग्राहकांशी संवाद साधला़ संखे म्हणाले, स्थानिक ठिकाणी तक्रार निवारण न झालेल्या व न्याय न मिळालेल्या वीज ग्राहकांसाठी २००३ मध्ये विद्युत लोकपालची स्थापना करण्यात आली़ २००५ मध्ये या कक्षाचे कामकाज सुरू झाले़ मुंबई विद्युत लोकपालच्या कक्षेत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, जळगाव हे जिल्हे येतात़ उर्वरित जिल्ह्यांसाठी नागपूर येथे लोकपाल कक्ष आहे़ महावितरण कंपनीचे तीन कोटीपेक्षा जास्त ग्राहक आहेत़ बहुतांशीवेळा ग्राहकांच्या तक्रारींचे स्थानिक ठिकाणी असलेल्या व्यवस्थेमार्फत निवारण होत नाही़ अशा ग्राहकांसाठी विद्युत लोकपाल हा पर्याय आहे़ विद्युत लोकपालकडे प्रकरण आल्यास ते दोन महिन्यात निकाली काढले जाते़ मुंबई वगळता महाराष्ट्रात महावितरण कंपनीमार्फत ग्राहकांना वीज सेवा दिली जाते, त्यामुळे त्यांचा विस्तार मोठा आहे़ ग्रामीण भागात वीज पुरवठ्याच्या अनेक अडचणी आहेत़ ग्राहकांना चांगली आणि तत्पर सेवा देणे गरजेचे असून, यामध्ये आणखी काय सुधारणा करता येतील याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात येणार आहे असे ते म्हणाले़ महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे अपेक्षित आहे़ त्यांना चांगली सेवा मिळाली तर तक्रारींचे प्रमाण कमी होते़ विद्युत लोकपाल ही व्यवस्था ग्राहकांना न्याय देण्यासाठी आहे़ तत्पर सेवा देण्याची महावितरण कंपनीची जबाबदारी असल्याचे संखे म्हणाले़ (प्रतिनिधी)६० दिवसांत निकाल विद्युत ग्राहकांची काही तक्रार असल्यास ते महावितरण कंपनीच्या तक्रार निवारण कक्षाकडे दाखल करू शकतात़ तेथे निवारण न झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करू शकतात़ तेथेही ग्राहकांचे समाधान न झाल्यास ते मुंबई येथे विद्युत लोकपालकडे तक्रार दाखल करून शकतात़ लोकपालकडे तक्रार दाखल केल्यास त्या प्रकरणाचा ६० दिवसांच्या आत निर्णय दिला जातो़
महावितरणपेक्षा टाटा, रिलायन्सची सेवा चांगली
By admin | Updated: June 17, 2016 23:38 IST